दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका २५ एप्रिल रोजी होणार आहेत. अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेत दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (२१ एप्रिल) पत्रकार परिषदेत बोलताना सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी आम आदमी पार्टी यावेळी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.
महापौरपदाची निवडणूक लढवण्यास ‘आप’ने नकार दिल्यानंतर, आता दिल्लीत भाजपला महापौर निवडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता भाजपने महापौरपदासाठी राजा इक्बाल सिंग आणि उपमहापौरपदासाठी जय भगवान यादव यांना पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. या महिन्याच्या अखेरीस दिल्लीत महापौरपदाच्या निवडणुका होणार आहेत. अलिकडेच दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनीही महापौर निवडणुकीत सहभागी होणाऱ्यांची नावे जाहीर केली होती.
यावेळी ‘आप’ने भाजपवर पक्ष फोडल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेत्या आतिशी म्हणाल्या आहेत की, भाजप मागच्या दाराने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करते, हे आपण अनेक राज्यांमध्ये पाहिले आहे. ‘आप’ची ताकद वळविण्यासाठी गुजरात निवडणुकीसोबत एमसीडी निवडणुकाही घेण्यात आल्या. गेल्या अडीच वर्षांपासून भाजपने आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांवर दबाव आणून आणि धमकावून त्यांना सोबत घेतले. एमसीडीमध्ये भाजपचे बहुमत आहे. तोडफोड करून भाजपला ट्रिपल इंजिन सरकार स्थापन करण्याची संधी मिळत आहे. भाजपने आपली आश्वासने पूर्ण करावीत.
हे ही वाचा :
“पोप फ्रान्सिस यांना करुणा, आध्यात्मिक धैर्याचे दीपस्तंभ म्हणून लक्षात ठेवलं जाईल”
राहुल गांधींनी जनतेत जावं, जगभरात भारताची बदनामी करून मते वाढणार नाहीत!
१८० अधिकाऱ्यांपैकी ४१ टक्के महिला
दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीतून आपने माघार घेताच दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख प्रवीण शंकर कपूर यांनी पक्षाला टोला लगावला. ते म्हणाले, आम आदमी पक्षाला हे चांगलेच माहिती आहे की त्यांनी गेल्या अडीच वर्षांत दिल्ली महानगरपालिकेत बहुमत गमावले आहे आणि महापालिकेचे प्रशासकीय आणि देखभालीचे कामही थांबवले आहे. म्हणून आता आम आदमी पक्ष पक्षत्यागाचे नाटक करत आहे आणि येथून पुढे ‘आप’ आणि ‘काँग्रेस’ यांची युती होण्याची शक्यता आहे.