कामगाराची व्यथा; मी बोगद्यात अडकलोय, हे आईला सांगू नकोस!

बोगद्यात अडकलेल्या पुष्करचा भावाला संदेश

कामगाराची व्यथा; मी बोगद्यात अडकलोय, हे आईला सांगू नकोस!

‘भाई, बोगद्यात अडकलेल्या कामगारांमध्ये मीदेखील आहे, हे आईला सांगू नकोस,’ अशी कळकळीची विनंती केली आहे पुष्करने. उत्तरकाशीमध्ये सिल्कयारा बोगद्यात काम करताना एक भाग कोसळल्याने ४१ कामगार तब्बल १५० तासांहून अधिक तास आत अडकले आहेत. त्यापैकीच एक आहे, पुष्कर. मात्र पुष्कर सिंह याला तो अडकलाय याची नव्हे तर, तर आई काळजीत पडेल, याची चिंता भेडसावते आहे.

 

या कामगारांशी संपर्क साधण्यासाठी येथे पाइप खोदण्यात आला आहे, त्यातूनच या कामगारांना सुका मेवा आणि औषधे पुरवली जात आहेत आणि हाच पाइप या कामगारांचे बाहेरच्या जगाशी संपर्काचे साधनही आहे. याच पाइपच्या मदतीने पुष्करने त्याचा भाऊ विक्रमशी संवाद साधून ‘तू आईला खरे सांगितलेस तर, ती काळजीत पडेल,’ असे बजावले आहे.

 

गेल्या १५० तासांहून अधिक काळ बोगद्यात अडकलेला २५ वर्षांचा पुष्कर हा बांधकाम मजूर म्हणून काम करतो. गेले सहा दिवस प्रकाशाची तिरीपही न जाणाऱ्या, हवेची झुळूकही नसणाऱ्या बोगद्यात तो अडकल्याने त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे हा संदेश देताना त्याच्या तोंडातून स्पष्ट शब्दही बाहेर पडत नाहीत. तो केवळ पुटपुटू शकला. पण तरीही आपण व्यवस्थित असल्याचेच तो भावाला सांगत होता. ‘मी अगदी व्यवस्थित आहे. इथे आणखीही माणसे आहेत. पण तू खरं काय ते सांगू नकोस. उगाच आपली आई चिंतेत पडेल,’ असे पुष्करने विक्रमला सांगितले.

हे ही वाचा:

मुंबई- अहमदाबाद- मुंबई ‘क्रिकेट स्पेशल’ ट्रेन धावणार!

जरांगेच्या मागे कोण?

दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय

मुंबईतील गजबजलेल्या माझगावमध्ये गोळीबार

चंपावत जिल्ह्यातील छानी गोठ गावचा रहिवासी असणारा विक्रम भावाशी बोलणे झाल्यानंतर हमसाहमशी रडू लागला. ‘मला शुक्रवारी त्याच्याशी थोडा वेळ का होईना, बोलण्याची संधी मिळाली. पण त्याला आमच्या आईचीच चिंता भेडसावत होती. आम्हाला अवघे काही सेकंदच बोलता आले. मी लगेचच त्याला त्याच्या प्रकृतीबाबत विचारले आणि बाहेर सुरू असलेल्या बचावमोहिमेबाबत माहिती दिली. तो धाकटा असल्याने आईचा लाडका आहे,’ असे विक्रमने सांगितले.

 

उत्तरांखंड रोडवेज येथे हेल्पर म्हणून काम करणाऱ्याला विक्रमला घटनेची माहिती कळताच त्याने तातडीने वृद्ध मातापित्यांना काहीही न सांगता उत्तरकाशी येथे धाव घेतली. पण शेजारच्यांनी त्यांना सांगितलेच. त्यांना मोठा धक्का बसला आहे. आईची अवस्था बिकट झाल्याबाबत पुष्करला सांगितलेले नाही, असे विक्रमने सांगितले.

Exit mobile version