25 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
घरविशेषहा कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपतींचा अपमान नाही तर काय आहे?

हा कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपतींचा अपमान नाही तर काय आहे?

आता शाहू महाराजांना काँग्रेसचे खरे रंग कळले असतील, तर ठीक.

Google News Follow

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सांगली दौऱ्यावर आलेले असतानाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. सांगली दौऱ्यात माजी नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झाले होते. त्यानिमित्ताने बोलताना त्यांनी महाराष्ट्रात शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून टीका केली होती. त्याच कार्यक्रमात मंचावर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती राहुल गांधींना भेटण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे व्हीडिओत दिसत होते. त्यावरून सध्या चर्चा रंगली आहे.

शाहू महाराज छत्रपती हे  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते आणि ते कोल्हापूरमधून निवडून आले. राहुल गांधी यांचे सांगलीत आगमन झाले तेव्हा ते त्यांना भेटण्यासाठी गेले होते. पण मंचावर शाहू महाराज राहुल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांना कुणीही भेट दिली नाही. त्यांच्या हातात एक शाल दिसत असून ती राहुल गांधींना देण्यासाठी ते इच्छुक असल्याचे दिसते पण त्यांना राहुल गांधी यांच्यापर्यंत कुणीही नेत नाही. इतर कार्यकर्ते, पदाधिकारी राहुल गांधींच्या जवळ जाऊन त्यांच्यासोबत फोटो काढतात पण शाहू महाराज मात्र मागे प्रतीक्षा करत उभे असतात. त्यांनी राहुल गांधी यांना शाल परिधान केली की नाही हे व्हीडिओत दिसत नाही, पण जरी ती दिली असली तरी शाहू महाराज छत्रपतींसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला अशापद्धतीने मंचावर वागणूक दिली जाते हे दुर्दैव.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हेदेखील मंचावर दिसतात पण त्यापैकी कुणीही शाहू महाराजांना राहुल गांधी यांच्यापाशी नेण्याचा प्रयत्न करत नाही. शाहू महाराज शाल घेऊन राहुल गांधी यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. शाहू महाराज यांना काँग्रेसने उमेदवारी दिली हे निश्चित पण खासदारापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार म्हणवल्या जाणाऱ्या शाहू महाराज छत्रपतींना अशी वागणूक देण्याचा परवाना काँग्रेसला मिळाला का, असा सवास उपस्थित केला गेला तर त्यात चुकीचे काय?

याच सभेत राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा म्हणून सांगतात. शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील पुतळा कोसळल्याप्रकरणी मोदींनी पालघरच्या सभेत माफी मागितली होती, पण शिवाजी महाराजांची नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेची माफी राहुल गांधी यांना हवी आहे. मग या शाहू महाराजांच्या अपमानाबद्दल कोण माफी मागणार आहे? मुळात काँग्रेसचा आणि शिवाजी महाराजांचा संबंधच नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा आदर्श, याबद्दल काँग्रेसने कधीही दखल घेतलेली नाही. सिंधुदुर्गातला पुतळा कोसळल्यावर मात्र अचानक त्यांना शिवप्रेमाचे भरते आले. एरवी शिवाजी महाराजांचा आपल्या सभांमधून ना जयजयकार केला जात ना कधी शिवजयंतीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर होत. त्यामुळे काँग्रेसने शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर जे अश्रु ढाळले ते मगरीचे आहेत, यात शंका नाही.

हे ही वाचा:

‘सुरतेची लूट’ म्हणणाऱ्यांना इतिहास अभ्यासक सदानंद मोरेंची चपराक

ममता सरकारवर नाराज खासदाराने दिला राजीनामा

मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये गणपतीच्या आगमनावेळी दगडफेक !

भारताकडून झिम्बाब्वे, झांबियाला तांदूळ, मक्याची मदत !

याच मंचावर शरद पवारही दिसतात. त्यांच्या तर बोलण्यात शाहू, फुले, आंबेडकर असतात. शिवाजी महाराजांचा त्यांच्या पक्षाला केव्हाच विसर पडला होता. आजकाल यावरून टीका होऊ लागल्यावर शिव शाहू फुले आंबेडकर अशी नवी घोषणा तयार करण्यात आली आहे. पण याच विचारधारेत जर शाहू महाराज येतात तर मग आताच्या खासदार शाहू महाराजांच्या अपमानाबद्दल पवारांना संताप यायला हवा. पण शिवाजी महाराजांवरून फक्त राजकारण करायचे, मात्र त्यांच्या कर्तृत्वाचे कधी स्मरण करायचे नाही, हा दुटप्पीपणा करायचा असल्यामुळे कोल्हापूरच्या शाहू महाराजांना मिळालेली वागणूक त्यांच्या लेखी दुय्यमच आहे.

शरद पवार २०१६मध्ये तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकार असताना काय म्हणाले होते हे सगळ्यांना आठवत असेल. तेव्हा शाहू महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांना खासदारकी भाजपाकडून देण्यात आली होती. तेव्हा पवार म्हणाले होते की, पूर्वी छत्रपती पेशव्यांना नियुक्त करत आता पेशवे छत्रपतींना नियुक्त करतात. याचा अर्थ त्यांनी फडणवीसांना पेशव्यांची उपमा दिली होती. ते शरद पवार काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना नेमकी कशी वागणूक देण्यात आली हे सांगू शकतील का?

या सगळ्या प्रकाराची कुठेही चर्चा झााली नाही किंवा त्याविषयी बातम्याही प्रसिद्ध झाल्या नाहीत. कारण ते सोयीचे नव्हते. नाहीतर शरद पवार अनवाणी आंदोलनात उतरले याची बातमी दिवसभर दाखविली गेली. पण शाहू महाराजांना राहुल गांधी यांना शाल अर्पण करण्यासाठी धावपळ करावी लागली, त्याचे कुणालाही सोयरसुतक नव्हते. आता शाहू महाराजांना काँग्रेसचे खरे रंग कळले असतील, तर ठीक. घराणेशाहीच्या अमलाखाली असलेल्या काँग्रेसला गुलाम पदाधिकारी आणि नेते हवेत, जे गांधी कुटुंबाची तळी उचलून धरतील, त्यांच्या मागेपुढे करतील, त्यांच्यापुढे झुकून सलाम, मुजरा करतील. शाहू महाराजांकडूनही काँग्रेसला हीच अपेक्षा असावी. आता शाहू महाराजांनी काँग्रेसची ही नीती ओळखली असेल तर ठीक. नाहीतर राहुल गांधींकडून अशी वागणूक ही काही नवी नाही. ते दुसऱ्यांना कितीही हुकुमशहा वगैरे म्हणत असले तरी त्यांची प्रवृत्ती ही हुकुमशाही आहे, हे या घटनेवरून पुरेसे स्पष्ट दिसते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा