छत्रपती संभाजीनगर येथे भाषण देताना न्यायव्यवस्थेचे ”सत्यमेव जयते” हे ब्रीद अधिकृतपणे बदलले असून ते “यतो धर्मस्ततो जयः” झाले असा धादांत खोटा प्रचार केल्याने निरंजन टकले विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात २५ मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवेक विचार मंचाचे कार्यकर्ते आप्पासाहेब बाबासाहेब पारधे यांनी फिर्याद दिली.
२३ फेब्रुवारी २०२५ रोजी निरंजन टकले यांचे छत्रपती संभाजीनगरमधील आमखास मैदान येथे १९ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात भाषण झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले कि, “हे जे सत्यमेव जयते होतं ना, न्यायव्यवस्थेचे आणि देशाचे ब्रीद ते आता “यतो धर्मस्ततो जयः” असं बदलून टाकले आहे, ऑफिसियली. आत्तापर्यंत आपण म्हणत होतो, सत्य कि जय हो. सत्यमेव जयते चा अर्थच तो आहे सत्याचाच विजय होणार आणि याचे नवीन स्लोगन सांगत, यतो धर्मस्ततो जयः धर्माचाच विजय होणार, मग ती कितीका असत्याची बाजू असेना. हे परिवर्तन होतंय म्हणून मी म्हटलंय हा जुडिशरी मधून सुध्दा मनुवाद असा आणला जातोय.
वास्तवात सर्वोच्च न्यायालयाच्या लोगो मधील ब्रीदवाक्य “यतो धर्मस्ततो जयः” असे पूर्वीपासून आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या ध्वजाचे व चिन्हाचे अनावरण केले, त्यातही “यतो धर्मस्ततो जयः” हेच ब्रीदवाक्य आहे. मात्र विकृत मानसिकतेचे टकले यांनी हेतुपुरस्सर धादांत खोटी मांडणी करून समाजाची दिशाभूल केली.
तसेच आपल्या भाषणात परभणी येतील घटनेचा संदर्भात बोलताना निरंजन टकले म्हणाले, “… हा खोटारडेपणा करण्याची हिम्मत राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये सुद्धा येते. याचे कारण हा विद्रोह अजून रस्त्यावर झालेला दिसत नाही, आणि आता तो घडवायचा आहे. व्हायलाच हवा आहे तो, कोणत्याही परिस्थितीत. कृषी आंदोलनाने विद्रोह कसा करायचा हे दाखवून दिलं आहे.”, असे टकले म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर टीका करणे, तसेच जनतेच्या न्याय हक्कासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन, संघर्ष करणे यात काहीच चुकीचे नाही. लोकशाहीत सरकार आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधात भूमिका घेणे, आंदोलन करणे हा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे. परंतु कृषी आंदोलनात देशाच्या प्रजासत्ताक दिनी हिंसक उद्रेक होऊन पोलिसांवर हल्ले झाले होते. तरीही जाणीवपूर्वक या आंदोलनाचा उल्लेख करून टकले यांनी अराजकता भडकविण्याचा हेतूने उद्रेकाची चिथावणी दिली आहे.
निरंजन टकले यांनी भाषणात चालूगिरी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही अपशब्द उच्चारले आहेत. मोदींवर टीका जरूर करावी. परंतु देशाच्या पंतप्रधानांवर टीका करताना शिवराळ भाषेत बोलणे चूक आहे. ३ मार्च, २०२५ रोजी टकले यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील विवेक विचार मंचचे कार्यकर्ते आप्पासाहेब बाबासाहेब पारधे यांनी तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी २५ मार्च २०२५ रोजी टकले यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५३ (२), ३५६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा :
नागपूर हिंसाचार: जमावाला भडकवल्या प्रकरणी फैजानला अटक!
छत्तीसगड : नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात एक जवान जखमी!
म्यानमार आणि बँकॉकला भूकंपाचा धक्का, भारताकडून मदतीचे आश्वासन!
ग्रेटर नोएडात मुलींच्या वसतिगृहाला आग, विद्यार्थिनींनी मारल्या इमारतीवरून उड्या
दरम्यान, न्यायव्यवस्थेचे ब्रीद अधिकृतपणे बदलले असा धादांत खोटा प्रचार केल्याबद्दल निरंजन टकले यांनी जाहीर माफी मागावी. तसेच पोलिसांनी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून अराजकतावादी निरंजन टकले विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विवेक विचार मंचाकडून करण्यात आली आहे.