एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’सह ‘इंडिया’ही!

संस्थेचे संचालक दिनेश प्रसाद साकलानी यांनी दिली माहिती

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’सह ‘इंडिया’ही!

‘देशाच्या राज्यघटनेप्रमाणेच शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तकांतही ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन्ही शब्दांचा वापर केल जाईल. या संदर्भातील वाद निरर्थक आहे,’ असे संस्थेचे संचालक दिनेश प्रसाद साकलानी यांनी म्हटले आहे.

सर्व वर्गांच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हे नाव वापरण्याची शिफारस सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमावर काम करणाऱ्या उच्च-स्तरीय समितीने केली आहे. ‘पुस्तकांमध्ये हे दोन्ही शब्द वापरले जातील. ‘एनसीईआरटी’ला यापैकी कोणत्याही शब्दाबद्दल तक्रार नाही,’ असे त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
‘हे दोन्ही शब्द वापरणे योग्य आहे.

आमची भूमिका राज्यघटनेला अनुसरूनच आहे व ती कायम राहील. आपण ‘इंडिया’ वापरू शकतो व ‘भारत’ही वापरू शकतो. त्यात काय अडचण आहे? यावर वादविवाद होऊ शकत नाही. जिथे योग्य असेल, तिथे ‘इंडिया’चा वापर करू व जिथे ‘भारत’ वापरणे योग्य आहे, तिथे या शब्दाचा वापर करू,’असे साकलानी म्हणाले. ‘आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आधीही या दोन्ही शब्दांचा वापर केल जात होता व पुढेही तो कायम राहील,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

हे ही वाचा:

मानवी चूक, सिग्नलकडे दुर्लक्ष, स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेत बिघाड…

भाऊ, वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत हिंदू बहिणींवर लग्नासाठी दबाव!

अण्वस्त्रांच्या संख्येत भारत पाकिस्तानच्या पुढे

इटलीच्या किनारपट्टीनजीक स्थलांतरितांचे जहाज बुडून ११ जणांचा मृत्यू

सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’च्या जागी ‘भारत’ असा शब्दप्रयोग करण्याची शिफारस शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेल्या सामाजिक शास्त्रांसाठीच्या एका उच्चस्तरीय समितीने गेल्या वर्षी केली होती.
‘अभ्यासक्रमात प्राचीन इतिहासाऐवजी अभिजात इतिहास आणि सर्व विषयांच्या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणाली समाविष्ट करण्याची शिफारस आम्ही केली आहे,’ असे या समितीचे अध्यक्ष सी. आय. इसाक यांनी म्हटले होते.

सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’ हे नाव वापरण्याची शिफारसही समितीने एकमताने केली आहे. हे अतिशय प्राचीन नाव असून सात वर्षांपूर्वीच्या विष्णुपुराणसारख्या ग्रंथांमध्ये याचा वापर करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र समितीच्या शिफारशींवर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे ‘एनसीईआरटी’ने म्हटले होते.

Exit mobile version