पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचवी, आठवीच्या परीक्षेत पास व्हावचं लागणार!

राज्य सरकारकडून शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा

पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचवी, आठवीच्या परीक्षेत पास व्हावचं लागणार!

राज्यात शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली आहे. तसेच पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी या संदर्भातील पत्र काढले आहे.

शिक्षण हक्क कायदा २०११ तील तरतुदीनुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात येते. त्यात आता पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.

यापूर्वी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होत असत मात्र, पुढील वर्षात प्रवेश घेण्यासाठी उत्तीर्ण होणे बंधनकारक नव्हते.

राज्य सरकारच्या पत्रात काय म्हटले आहे?

पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. मात्र, सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.

एकदा अपयश मिळवलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा एक संधी दिली जाईल. मात्र, तरीही तो नापास झाल्यास त्याला पुन्हा पाचवीच्याच वर्गात प्रवेश दिला जाईल. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) पाचवी आणि आठवीसाठीच्या वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.

हे ही वाचा:

 

‘प्लेन हायजॅक का प्लॅन है’ असा संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक

गेल्या वर्षी मुंबईत मॅनहोलची झाकणे पळवण्याचा विक्रम

मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट करणार, मुंबई पोलिसांना धमकी

विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर त्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात येईल. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. संबंधित विद्यार्थी पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा पाचवी किंवा आठवीच्याच वर्गात ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही.

Exit mobile version