कांदिवलीतील आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरणानंतर वाहतुकीसाठी खुला

आमदार अतुल भातखळकर यांचा कार्य अहवाल प्रकाशित

कांदिवलीतील आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरणानंतर वाहतुकीसाठी खुला

आमदार अतुल भातखळकर यांच्या अथक प्रयत्नांतून करण्यात आलेल्या कांदिवली पूर्वेकडील आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरण प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आकुर्ली भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास नेले आहे. या आधीचा आकुर्ली भुयारी मार्ग हा 11 मीटर रुंदीचा होता, आता रुंदीकरणानंतर हा मार्ग 26 मीटर इतका रुंद झालेला आहे. कांदिवली पूर्वेला होणारी वाहतूककोंडी हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. वाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरत असणारा हा मार्ग आता रुंदीकरणानंतर मात्र सुसाट झाला आहे. हा भुयारी मार्ग आता सेवेत दाखल झाल्याने कांदिवली पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास वेगवान झाला आहे. त्याचवेळी वांद्रे – बोरिवली प्रवास करणाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

हेही वाचा..

तुतारी पक्ष मुस्लीम लीगचा पार्टनर आहे का?

डासना मंदिरावर हल्ला करणाऱ्या कट्टरपंथीयांवर कारवाई करावी!

मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीने स्वीकारला विधानसभा निवडणुकीतील पराभव?

पहिल्या दिवशी १५ हजार मुंबईकरांनी केला मेट्रो- ३ भुयारी मार्गावरून प्रवास

याच वेळी आमदार अतुल भातखळकर यांच्या गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांच्या कार्यअहवालाचेही प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, कांदिवलीतील या आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरणाचे श्रेय हे आमदार अतुल भातखळकर यांना एकहाती जाते. जनहितासाठी काम करण्यात अतुल भातखळकर हे कायम तत्पर असतात असंही ते म्हणाले. मुख्य म्हणजे एखाद्या कामाचा पाठपुरावा करण्यात भातखळकरांचा कुणीच हात धरू शकत नाही असंही मत यावेळी पियुष गोयल यांनी व्यक्त केले. या प्रसंगी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशीष शेलार म्हणाले, अतुल भातखळकर एक माणूस म्हणून एक आमदार म्हणून तसंच एक नेता म्हणून मास्टर ब्लास्टर आहेत.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले, माझ्या विभागातील हा एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा देणारा प्रकल्प आहे. हा आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मला शासन तसेच शासनेतर सहकारी मित्रांचा पाठिंबा खूप मोलाचा होता. केंद्रातील आणि राज्यातील मंत्र्यांनी मला वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे हा आकुर्ली भुयारी रुंदीकरण मार्ग आज जनतेसाठी खुला झाला आहे.

माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनीही या प्रसंगी भाषण करताना आमदार अतुल भातखळकर यांच्या समाजकार्याचे कौतुक केले. कांदिवली पूर्व भागातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version