स्त्री शक्तीचा जागर: हिंदू मंदिरांच्या निर्मात्या, संरक्षक अहिल्याबाई होळकर

स्त्री शक्तीचा जागर: हिंदू मंदिरांच्या निर्मात्या, संरक्षक अहिल्याबाई होळकर

दुर्गा देवीला समर्पित अशा नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ही रूपं म्हणजे ऊर्जा, शक्ती आणि प्रेरणा. असेच एक प्रेरणास्त्रोत म्हणजे राणी अहिल्याबाई होळकर. भारतीय इतिहासातील एक कुशल महिला शासक, निष्पक्षता आणि सुशासनाने लोकाभिमुख कारभार करणाऱ्या अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.

अहिल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगरच्या चौंडी गावात झाला. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले. मराठ्यांच्या इतिहासातील कर्तबगार व्यक्तिमत्त्व म्हणून इंदौर संस्थानच्या मल्हारराव होळकरांना ओळखलं जातं. अहिल्याबाईंचा एकूणच चुणचुणीत स्वभाव पाहून मल्हाररावांनी त्यांच्या मुलासाठी अहिल्याबाईंना मागणी घातली आणि खंडेराव होळकर यांच्यासोबत नऊ वर्षांच्या अहिल्येचा बालविवाह झाला. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकरही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाई होळकर या एक चतुर राणी होत्या आणि न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यात पारंगत होत्या. इतिहासात त्यांच्या कुशल शासनाचा अमीट ठसा उमटलेला आहेच, तसाच ठसा त्यांनी भारतात हिंदू मंदिरांसाठी जे कार्य केले त्याचाही उमटलेला आहे.

अहिल्याबाई यांना देशभरातील हिंदू मंदिरांच्या निर्मात्या आणि संरक्षक म्हणून ओळखले जाते. पश्चिमेकडील सोमनाथपासून, पूर्वेकडील काशी विश्वनाथपर्यंत अहिल्याबाईंनी त्या काळातील विध्वंसाला बळी पडलेल्या अनेक मंदिरांचे पुनरुज्जीवन केले. मुस्लिम आक्रमकांकडून हल्ले आणि लुटीला बळी पडलेल्या मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणीसाठी अर्थसहाय्य देऊ केले. त्यांनी हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, वाराणसी, पुरी, रामेश्वरम, नाशिक, महाबळेश्वर, पुणे, इंदूर, गोकर्ण अशा अनेक ठिकाणी मंदिरे बांधली. हिंदू धर्मात गंगा नदीला विशेष महत्त्व आहे, गंगा नदीचे पाणी पवित्र मानले जाते हे जाणून अहिल्यादेवींनी, गंगेच्या उगमाचे म्हणजेच ‘गंगोत्री’चे पाणी भारतातील सर्व मंदिरांपर्यंत अगदी केरळ, तामिळनाडूपर्यंत पोहोचवण्याची सोय केली होती.

हे ही वाचा : 

कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद

अमितभाई कल किसने देखा? आताच निर्णय घ्या…

अटल सेतुवर एका आठवड्यात दोन आत्महत्या, दोन्ही मृतदेह सापडले!

उबाठाचे गाणे ‘उतलो माय, मातलो गं माय’ असं हवं होतं !

त्यांच्या या अफाट लोकसेवेचा, मंदिरांसाठी जीवन समर्पित केलेल्याचा, लोकोपयोगी वास्तू उभारण्यासाठी धडपड करण्याच्या समाजकार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात आजही अभिमानाने केला जातो. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्याबाईंचे निधन झाले. अशा या प्रेरणास्त्रोताला नमन!

Exit mobile version