लाइफजॅकेट न दिल्याने १४ शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

शिक्षण मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

लाइफजॅकेट न दिल्याने १४ शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

बडोदा येथील तलावात बोटीची सफर करताना शाळेच्या मुलांना लाइफजॅकेटच दिले नसल्याचे उघड झाले आहे. बोटीतून तलावाची सफर करताना सेल्फी घेताना २७ मुलांनी भरलेली बोट उलटून १४ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

‘माझा मुलगा पिकनिकसाठी आला होता. मात्र, त्याची तब्येत बिघडली. त्याच्या शिक्षकांनी याबाबत आम्हाला कळवले. मी त्याला पाहण्यासाठी तलावाकिनारी पोहोचलो तेव्हा तो बोटीत दिसला. मी किनाऱ्यावर उभा राहूनच त्याची वाट पाहात होतो. तेव्हा बोट उलटली. मात्र, लगेचच लोकांनी त्याला वाचवले,’ अशी माहिती बडोद्याच्या हरनी तलावात घडलेल्या दुर्घटनेतील पीडित मुलाच्या वडिलांनी दिली. बोट उलटल्यानंतर आसपासच्या व्यक्ती आणि गोताखोरांनी सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सर्वांना वाचवू शकले नाहीत.

रुग्णालयात पोहोचलेल्या एका नातेवाइकाने सांगितले की, मुलांना लाइफजॅकेट दिले गेले नव्हते. तिथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती. एका मृत विद्यार्थिनीच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला होता. ‘माझी मुलगी बोटीत होती. ती पिकनिकसाठी आली होती. मात्र दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी आलो आहे. संपूर्ण दुर्घटनेसाठी कोण जबाबदार आहे, मला समजतच नाहीये,’ असे तिचे वडील सांगत होते.

दुकानमालकाने चार मुलांना वाचवले

तलावानजीक दुकान चालवणारे मुकेश खावडू दुर्घटना घडली तेव्हा दुकानातच होते. तेव्हा त्यांनी किंकाळी ऐकली. त्यांना सुरुवातीला काही समजले नाही. नंतर त्यांना समजले की, ते मदतीची मागणी करत आहेत. त्यानंतर एक मिनिटही न दवडता त्यांनी तलावात उडी मारून चार मुलांना वाचवले.

हे ही वाचा:

विराट कोहलीचे क्षेत्ररक्षण पाहून आनंद महिंद्राही भारावले

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने तीन संशयितांना घेतलं ताब्यात

बलोच फुटीरतावाद्यांची पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा!

‘एमपीएससी’मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत शेतकऱ्याच्या मुलाची बाजी

शिक्षणमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

गुजरातचे शिक्षण मंत्री कुबेर डिंडोर यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक जण होते. बोटीची क्षमता १४ प्रवाशांची होती. मात्र त्यात २७ जण होते. चौकशी अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन डिंडोर यांनी दिले आहे.

Exit mobile version