“मविआने जागा वाटपाच्या वेळी विश्वासात घेतले नाही”

जागा वाटपावरून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी

“मविआने जागा वाटपाच्या वेळी विश्वासात घेतले नाही”

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला तरी यावरून पक्षांमधील अंतर्गत कलह बाहेर येत आहे. अद्याप सांगली आणि मुंबईतील जागा वाटपावरुन काँग्रेसमधील नाराजी दूर झालेली नाही हे स्पष्ट आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर अखेर वर्षा गायकवाड यांनी गुरुवार, ११ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.

“मुंबईचं जे अस्तित्व आहे ते वेगळं आहे. मुंबईच्या बाबतीत चर्चा करत असताना आम्हाला काही अपेक्षा होत्या. मुंबईतल्या दोन जागा सोडण्याचं काहीच कारण नव्हतं. मुंबईच्या जागावाटपात मला विश्वासात घेतलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला उमेदवार किंवा पक्ष विजयी झाला पाहिजे. यंदाची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ही निवडणूक लोकशाही तसेच संविधान वाचवण्यासाठीची आहे,” असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे.

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, “पक्ष श्रेष्ठींकडे म्हणणे मांडले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आमचे संघटन आहे. यामुळे मुंबईत पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावे, ही अपेक्षा होती. मुंबईतील कोणत्या जागा हव्या होत्या, ते पक्षातील श्रेष्ठींना सांगितले होते. जो उमेदवार जिंकणार आहे, त्याला तिकीट द्यावे, ही अपेक्षा होती,” अशा भावना वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावर चर्चा करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने कठोर भूमिका घ्यायला हवी होती. या जागा वाटपाच्या वेळी विश्वासात घेतले गेले नाही. परंतु, पक्षाशी एकनिष्ठ आहे. पक्षाचे प्रोटोकॉल पाळणार आहे. आघाडी असताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही तडजोडी कराव्या लागतात, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त करत जागा गमावल्याचे मान्य केले आहे.

ठाकरे गटाने मुंबईतील चार जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले यामुळे काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातही, ज्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर एकेकाळी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले होते, त्या जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह वर्षा गायकवाडांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नाराजी थेट दिल्लीला कळवली असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

केजरीवालांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांना पदावरून हटवले

पतंजलीला फटकारत सर्वोच्च न्यायालयाने माफीनामा फेटाळला

इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या नेत्याचे तीन मुलगे ठार

शुभमन गिल, राशिद खान यांनी साकारला गुजरातचा विजय

“मी नाराज असली तरी पक्षाशी एकनिष्ठ आहे. मुंबईत आम्हाला कमीत कमी दोन किंवा तीन जागा मिळायला हव्या होत्या, ही अपेक्षा होती. अनेक ठिकाणी आमचे संघटन असताना डावलण्यात आले आहे. तरी कार्यकर्ता म्हणून आपण काम करत राहणार आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version