‘इंडिया’च्या बैठकांचे यजमान उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवतायत

मंत्री दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

‘इंडिया’च्या बैठकांचे यजमान उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवतायत

‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडत असून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे या बैठकीची जबाबदारी आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडलेला आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरे पायदळी तुडवत आहेत. त्यांच्या विचारांचा उद्धव ठाकरेंना विसर पडलेला आहे. २०१४ मध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले नव्हते, त्यावेळी शरद पवारांनीच भाजपपाला बाहेरून बिनशब्द पाठिंबा दर्शवला होता. इंडिया आघाडीचे आलेले नेते बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन त्यांना वंदन करणार आहेत का? असा खोचक सवालही दीपक केसरकरांनी उपस्थित केला.

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे का? मी पक्ष विसर्जित करेन पण काँग्रेससोबत जाणार नाही, असं बाळासाहेब म्हणाले होते. मला एका दिवसाचा पंतप्रधान करा मी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम रद्द करीन असं बाळासाहेब म्हणाले होते. आज उद्धव ठाकरेंची ३७० कलमावर चर्चा करण्याची हिंमत आहे का? असा सवाल करत दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जम्मू-काश्मिरचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीका केली होती. आज उद्धव ठाकरे त्यांच्यासोबतचं बैठक घेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे, अशी सणसणीत टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. ‘युपीए’वर भ्रष्टाचाराचे डाग लागले त्यामुळे त्यांनी नाव बदलून ‘इंडिया’ ठेवले, असंही दीपक केसरकर म्हणाले.

हे ही वाचा:

भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय- २०२३’ परिषद

अजितदादांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, शरद पवारांनी पुतण्याविरोधात दंड थोपटले

जी२० च्या पाहुण्यांना त्रास नको म्हणून दिल्लीत लंगूरचे कटआऊट !

कुर्ल्यात गुंडाने केला गोळीबार, पूर्ववैमनस्यातून घडली घटना

जगातील सर्व देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. पाकिस्तानची जनता देखील पंतप्रधान मोदी यांचे नाव घेते. ‘मेक इन इंडिया’ मुळे आज शस्त्रास्त्र निर्मिती भारतात होऊ लागली आहे. अनेक देश भारतात गुंतवणूक करत आहेत, असे गौरवोद्गार दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना काढले.

Exit mobile version