तिरुपती लाडू प्रकरण; जगनमोहन यांचेच हे षडयंत्र!

भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्याकडून वायएसआरसीपीवर घणाघाती टीका

तिरुपती लाडू प्रकरण; जगनमोहन यांचेच हे षडयंत्र!

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील आधीच्या वायएसआर काँग्रेस (वायएसआरसीपी) सरकारवर आरोप करत धक्कादायक खुलासा केला आहे. वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात श्री व्यंकटेश्वर मंदिरात ‘प्रसाद’ म्हणून दिले जाणारे तिरुपती लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि निकृष्ट घटकांचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यावरून देशभरात हा मुद्दा चर्चेत असून संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी वायएसआरसीपीवर घणाघाती टीका केली आहे.

सुनील देवधर म्हणाले की, आंध्र प्रदेशमधील ही घटना म्हणजे हिंदूंचे हृदय आणि भावना आंदोलित करणारी आहे. जगभरातील हिंदू भाविक तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी हा अतिशय संवेदनक्षम असा विषय असून या मुद्द्यावरून हिंदूंच्या मनात राग आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे स्वतः ख्रिश्चन आहेत त्यांचे वडील ख्रिश्चन होते. २००९ मध्ये राजशेखर रेड्डी जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाही तिरुपती देवस्थानवरून त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते,” असे सुनील देवधर म्हणाले.

“तिरुपती मंदिर देवस्थान हे सेव्हन हिल्स म्हणून ओळखलं जातं. या सात हिल्स पैकी तीन हिल्स राजशेखर यांनी चर्चला देऊन टाकल्या. पुढे त्या हिल्सवर चर्च उभे राहिले आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संस्था बनल्या. त्या काळात तिरुपती देवस्थानचे प्रसाद बनवण्याचे कंत्राट एका ख्रिश्चन कंत्राटदाराला देण्यात आलं. प्रसाद बनवणारा व्यंकटेश स्वामींना शैतान मानतो. स्वतः गायीचे मांस खातो अशा श्रद्धा नसलेल्या व्यक्तीला प्रसाद बनवायचे कंत्राट कसं दिलं जातं?” असा संतप्त सवाल सुनील देवधर यांनी उपस्थित करत तत्कालीन आंध्र प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

“जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असतानाही या देवस्थान संबंधी अनेक मुद्दे समोर येत होते ज्यात स्पष्ट होतं होते की त्यांना तिरुपती देवस्थानचा उपयोग करून धर्मांतरण करायचे आहे. तिरुपती तिरुमाला बस सेवेच्या तिकिटावर मोफत जेरुसलेम यात्रा अशी जाहिरात देण्यात आली होती. पुढे प्रश्न उपस्थित करताच ही जाहिरात मागे घेण्यात आली. आंध्र प्रदेशमध्ये त्यांच्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात अनेक मंदिरं, मूर्ती तोडण्यात आल्या; पवित्र रथ जाळण्यात आले तरीही कोणालाही या प्रकरणांमध्ये अटक झालेली नाही. ख्रिश्चन मिशनऱ्यांना हे एकमेव राज्य महिन्याला तीन हजार रुपये पगार देत होते. चर्चच्या डागडुजीसाठी निधी दिला जात होता. तेलगु शाळा बंद करून त्या इंग्रजी शाळा करून त्या मिशनरींना चालवायला देण्याचा डाव आम्ही न्यायालयात जाऊन हाणून पाडला,” अशी माहिती सुनील देवधर यांनी दिली.

“वायएसआरसीपी ही आंध्र प्रदेशमधील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. ख्रिश्चन मिशनरी, जिहादी मुसलमान आणि अर्बन नक्षलवाद यांच्या समर्थनावर सरकार सत्तेत आलं की, त्यांच्या षडयंत्राला ते सरकार बळी पडतं आणि अशा दुर्घटना घडतात,” असं सुनील देवधर म्हणाले.

हे ही वाचा : 

धारावीत तणाव; मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यास विरोध, गाड्या फोडल्या

वडोदराजवळ रेल्वे उलटवण्याचा प्रयत्न; ट्रॅकच्या फिश प्लेट ठेवल्या पेरून

इस्रायलने हिजबुल्लाच्या कमांडरला अचूक टिपले

एफएटीएफने दहशतवाद विरोधी भारताच्या प्रयत्नांचे केले कौतुक, गंभीर धोक्याचा इशाराही दिला!

त्यांनी बोलताना भीती व्यक्त केली की, “महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या हातात सत्ता गेली की असे प्रकार तेथेही घडू शकतात. शरद पवार म्हणतातचं देव दर्शनाला फार जात नाही पण इफ्तार पार्ट्यांना जातात. उद्धव ठाकरे एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी होते पण ते आता मुस्लीम मतांच्या लांगूलचालनात लागलेले आहेत. राहुल गांधी हिंदुत्वाविरोधी जगभर बोलत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले तर पंढरपूर, शिर्डी, अंबाबाई यांच्या लाडूतही अशा गोष्टी होतील. आंध्र प्रदेशमधील घटना लहान नाही तर मोठ्या षडयंत्राचा एक हिस्सा आहे आणि हे रोखण्यासाठी हिंदूंनी जागृत व्हायला हवे,” असे आवाहन सुनील देवधर यांनी केले आहे.

Exit mobile version