जम्मू- काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे विशेष अधिवेशन सोमवार, २८ एप्रिल रोजी बोलावण्यात आले होते. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विधानसभेत भावनिक भाषण दिले. हल्ल्यात प्राण गमावलेल्या २६ जणांच्या कुटुंबियांसोबत असून त्यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
यावेळी ओमर अब्दुल्ला म्हणाले की, ही वेळ केंद्र सरकारकडून पूर्ण राज्याचा दर्जा मागण्याची नाही. इकडचे वातावरण चांगले राहावे आणि पाहुण्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेणे ही जम्मू आणि काश्मीरच्या निवडून आलेल्या सरकारची जबाबदारी आहे. आता जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणार नाही. जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी मी कोणत्या तोंडाने करू शकतो? आपण नेहमीच ही मागणी करू, पण जर मी आज अशी मागणी केली तर मला लाज वाटेल.
तसेच भाषण करताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भावुक झाले. त्यांनी म्हटले की पहलगाम सारख्या घटनेबद्दल माफी मागण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाहीत. राज्याचा मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री असल्याने मी पर्यटकांना काश्मीरला येण्याचे आमंत्रण दिले होते, पण मी त्यांना सुरक्षित परत पाठवू शकलो नाही. या हल्ल्याने आपल्याला आतून पोकळ केले आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, संपूर्ण देश या हल्ल्याने प्रभावित झाला आहे. हा पहिला हल्ला नव्हता. आपण अनेक हल्ले होताना पाहिले आहेत. पण नागरिकांवर इतका मोठा हल्ला झाला. मी त्यांना काय बोलावे? लहान मुले; ज्यांनी त्यांच्या वडिलांना रक्ताने माखलेले पाहिले. नौदल अधिकाऱ्याची विधवा जिचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. त्या तरुण आदिलबद्दल काय बोलावे? सर्वांनाच जीवाची काळजी असते. पण स्वतःच्या जीवाची चिंता न करता, त्याने पर्यटकांना आणि पाहुण्यांना वाचवण्यासाठी आपले प्राण दिले, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.
पुढे ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिक लोकांच्या भूमिकेचेही कौतुक केले. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खोल्या उपलब्ध करून दिल्या आणि पर्यटकांना राहण्यास सांगितले. वाहन चालकांनी मोफत सेवा दिली. अशा काश्मिरीयतला सलाम आहे आणि हे आमचे आतिथ्य आहे. कठुआपासून कुपवाडा पर्यंत असे कोणतेही शहर किंवा गाव नाही जिथे लोक बाहेर पडून या हल्ल्याचा निषेध करत नाहीत. लोकांनी घोषणाबाजी केली, बॅनर बनवले, मेणबत्त्या पेटवल्या ते आम्ही या हल्ल्यासोबत नाही हे सांगण्यासाठी, असं अब्दुल्ला म्हणाले.
हे ही वाचा :
कर्नाटक: रेल्वे परीक्षेला येण्यापूर्वी मंगळसूत्र, जानवे काढून ठेवण्यावरून वाद
“दहशतवाद्यांकडे धर्म विचारून मारण्याइतका पुरेसा वेळ नाही”
सिंधू नदीतून भारतीयांचे रक्त वाहिले तर पाकिस्तानींचे रक्तही वाहील
सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन
त्यानंतर ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “लोक आपल्यासोबत असतील तेव्हाच दहशतवाद संपेल आणि ही त्याची सुरुवात आहे. आपण असे कोणतेही पाऊल उचलू नये जे लोकांना आपल्यापासून दूर ढकलेल. लोकांच्या आत जन्मलेल्या भावना दुखावतील. हा दहशतवाद तेव्हाच संपेल जेव्हा लोक आपल्यासोबत असतील आणि आता असे दिसते की लोक आपल्यासोबत आहेत.”