काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान करत नवा वाद निर्माण केला आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली, असे सर्व प्रत्यक्षदर्शी आणि पीडितांचे नातेवाईक सांगत असताना विजय वडेट्टीवार यांनी वेगळेच विधान केले आहे. दहशतवाद्यांकडे धर्म विचारून मारण्याइतका पुरेसा वेळ नाही, अशा आशयाचे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का? दहशतवाद्यांकडे इतका वेळ नाही की समोरचा हिंदू आहे की मुस्लिम हे विचारत बसतील. या संपूर्ण प्रकरणात अनेक गोष्टी आहेत, लोक वेगवेगळे बोलत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो. दहशतवाद्यांनी देशावर हल्ला केला आहे आणि म्हणून त्यांना पकडले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. आज संपूर्ण देशाची ही भावना आहे. पण वेगवेगळ्या गोष्टी सांगून मूळ मुद्द्यांपासून दूर जाणे चुकीचे आहे,” असे वादग्रस्त विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.
हे ही वाचा :
सिंधू नदीतून भारतीयांचे रक्त वाहिले तर पाकिस्तानींचे रक्तही वाहील
सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन
घाटकोपर: सोमय्यांच्या तक्रारीनंतर मुस्लीम जमात गौसिया मशिदीचे भोंगे उतरवले!
विक्रोळीत १३ बांग्लादेशी फेरीवाले ताब्यात!
“सत्ताधारी नेहमी भारत- पाकिस्तान जप करत असतात. आता सांगावं की या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश असल्याचं सरकारने स्वीकारावं. पहलगाममध्ये जे काही घडलं, २७ जण त्या हल्ल्यात मारले गेले. पहलगाममध्ये, काश्मीर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था का नव्हती? दहशतवादी २०० किलोमीटरच्या आत कसे पोहोचतात? हे सगळं होत असताना मोदी सरकार काय करत होतं? गुप्तचर यंत्रणा काय करत होती? दहशतवाद्यांना लोकांकडे जाऊन त्यांच्या कानात विचारण्यासाठी पुरेसा वेळ आहे का की त्यांचा धर्म कोणता? ते म्हणाले की, दहशतवाद्यांवर कारवाई झाली पाहिजे. शेवटी, सुरक्षेत एवढी चूक कशी झाली? याचा विचार केला पाहिजे, परंतु या प्रकरणात दुसरीकडे लक्ष वळवणे चुकीचे आहे,” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.