शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र बंद मागे घ्या!

उच्च न्यायालयाने मविआला फटकारल्यानंतर शरद पवारांची भूमिका

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र बंद मागे घ्या!

महाविकास आघाडीने शनिवार, २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला फटकारलं असून महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार कोणत्याही राजकीय पक्षांना नसल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. बंदचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शरद पवारांनी शनिवारचा बंद मागे घ्यावा, असं आवाहन केलं आहे. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी निर्णयावर प्रतिक्रिया देताना पोस्ट करत म्हटले आहे की, “बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या, २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते,” अशा शब्दांत पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

हे ही वाचा :

गळाभेट, मग खांद्यावर हात, पंतप्रधान मोदी अन झेलेन्स्की यांची ऐतिहासिक भेट !

‘महाराष्ट्र बंद’ करण्याचा राजकीय पक्षांना अधिकार नाही, न्यायालयाने मविआला फटकारले

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही! म्हणत शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शकीब हल हसनवर हत्येचा गुन्हा

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात आणि न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. तसेच राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जे बंद पुकारतील त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यानंतर शरद पवार यांच्याकडून बंद मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं.

Exit mobile version