वंदे भारतनंतर ठाकरेंना बुलेट ट्रेनचीही सफर घडविणार

भाजपाने उद्धव ठाकरेंवर डागलं टीकास्त्र

वंदे भारतनंतर ठाकरेंना बुलेट ट्रेनचीही सफर घडविणार

देशातील बहुतांश लोक हे रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांचा प्रवास वेगवान आणि सुखाचा व्हावा यासाठी मोदी सरकारच्या पुढाकाराने रेल्वेने वंदे भारत ट्रेन सुरू केल्या आहेत. या गाड्यांना नागरिकांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. राजकारणीही या ट्रेनमधून प्रवास करतात. मात्र, विरोधक यावरून टीका करण्याची संधी सोडत नसल्याचेही चित्र आहे. ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही यात समावेश आहे.

केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करणारे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला. यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. शिवाय, त्यांच्यावर टीकाही करण्यात येत आहे. भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारतमधील प्रवासाचा फोटो ट्विट करत तिसरी बार, मोदी सरकार, असे कॅप्शन देत खोचक टीका केली आहे.

उद्धव ठाकरे हे ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर होते. कोकणातून घेतलेल्या सभांमधून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर आणि महायुती सरकारवर टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे संध्याकाळी खेड स्थानकावरुन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसले आणि खेड ते मुंबई प्रवास त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसमधून केला.

वंदे भारत एक्सप्रेस हा नरेंद्र मोदी यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत प्रवासाचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत विनायक राऊत दिसत आहे.

हे ही वाचा:

बाळा नांदगावकरांनी राज ठाकरेंना दिली बाबरीची वीट

ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग

लिव्ह इनची नोंदणी, हलाला, इद्दतवर बंदी….उत्तराखंड समान नागरी विधेयक सादर

औरंगजेबाने तोडले होते कृष्णजन्मभूमीतील मंदिर!

भाजपाने म्हटले आहे की, मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार, मोदी सरकार. दुसऱ्या एका फोटोवर भाजपा महाराष्ट्राकडून कॅप्शन दिले देण्यात आले आहे. “कुठे आहे विकास? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं. लवकरच बुलेट ट्रेनची देखील सफर घडवून आणणार.”

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही उद्धव ठाकरेंचा फोटो पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. वंदेभारतमध्ये प्रवास करताना ठाकरेंच्या चेहऱ्यावरचे हताश, निराश, वैफल्यग्रस्त भाव अगदीच गायब झालेले दिसतात नाही, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version