31 C
Mumbai
Sunday, October 27, 2024
घरराजकारण...म्हणे फडणवीस हे दुश्मन नव्हे विरोधक!

…म्हणे फडणवीस हे दुश्मन नव्हे विरोधक!

संजय राऊत यांचे हे विधान पटणारे आहे काय?

Google News Follow

Related

महाविकास आघाडीचा प्रयोग २०१९मध्ये केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे जणू महाविकास आघाडीचे प्रमुख लक्ष्य बनले. फडणवीसांची हेटाळणी करणे, त्यांची टिंगल करणे, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे म्हणजेच महाविकास आघाडीचा एककलमी कार्यक्रम बनला. त्या सरकारच्या काळातच नव्हे तर त्यानंतरही फडणवीस यांच्यावरच शरसंधान करण्याची मालिका सुरू राहिली. ही जी चिखलफेक फडणवीसांवर होत होती, ती राजकीय विरोधापोटी नव्हती तर त्यामागे एक द्वेष, असूया आणि घृणा होती. हे महाविकास आघाडी किंबहुना उद्धव ठाकरे गटाच्या भाषणांमधून प्रकर्षाने समोर येत होते. पण आता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आपण जे बोललो ते त्यांना केवळ राजकीय विरोधक मानूनच बोललो, ते काही आमचे दुश्मन नाहीत. त्यांच्याबाबत आमची कोणतीही व्यक्तिगत भावना नाही, असे स्पष्टीकरण उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर उबाठा गट किंवा उद्धव ठाकरे हे भाजपाच्या जवळ जाऊ इच्छितात का, असा तर्क कुणी मांडू शकेल. पण त्या निष्कर्षाप्रत आताच आपण येऊ शकत नाही. मात्र निदान आपण फडणवीसांना दुश्मन मानत नाही, असे जेव्हा संजय राऊत म्हणतात तेव्हा ते पटण्यासारखे तरी असले पाहिजे.

खरे तर, महाविकास आघाडीचा प्रयोग जेव्हा प्रत्यक्षात आला तेव्हा देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवणे, भाजपाला सत्तेपासून लांब ठेवणे हाच आपला उद्देश असल्याचे वारंवार सांगितले जात होते. त्यामुळे फडणवीसांच्या हातून सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांची थट्टा उडविण्याचा प्रयत्न केला जात होता. भाजपा आता काही सत्तेत येणार नाही, २५ वर्षे त्यांना सत्ता मिळणार नाही, असे खिजविण्यात येत होते. प्रत्यक्षात अडीच वर्षातच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि फडणवीस पुन्हा आले. पण तरीही महाविकास आघाडीचा फडणवीसांवरील राग काही शमला नाही. किंबहुना, त्यांच्याविरोधात शारीरिक टीका करण्यापर्यंतही माजी मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरेंनी मर्यादा पार केली. फडणवीसच कशाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्या पदाची प्रतिष्ठा न राखता त्यांनाही अद्वातद्वा बोलण्याची एकही संधी उबाठा गटाने सोडली नाही. कधी रिक्षावाला, कधी दाढीवाला असे काहीही बोलून त्यांची आपल्यालेखी कोणतीही किंमत नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न उबाठाने केला. तीच बाब फडणवीसांच्या बाबतीतही खरी ठरली.

हे ही वाचा:

सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबेल तेव्हाच बंगालमध्ये शांतता नांदेल!

गुप्तांगात लपवून आणले १ किलो वजनी सोने, तपासणी करताच पितळ उघड!

वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर ठोकला दावा, शेतकरी म्हणाले, आम्ही जायचे कुठे?

वयाच्या ६ व्या वर्षी घडला गुन्हा, १७ वर्षाची झाल्यावर केली तक्रार ,४ तासात मौलवीला केले गजाआड!

उद्धव ठाकरेंनी तर फडणवीसांना एक तर तू राहशील किंवा मी राहीन या पातळीपर्यंत आव्हान दिले. ते देण्याची आवश्यकता नव्हती. पण आपल्याकडून सत्ता खेचून नेल्यामुळे फडणवीसांना लक्ष्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण त्याची काही मर्यादा राखण्याची आवश्यकता होती. पण ती उद्धव ठाकरेंनी राखली नाही. आपण या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहोत, एका पक्षाचे प्रमुख आहोत, याचे भानही राहिले नाही. त्यातून मग अशी बेताल वक्तव्ये समोर येऊ लागली. ढेकणाने मला आव्हान देऊ नये. ढेकणांना आम्ही अंगठ्याने चिरडतो, अशी भाषाही उद्धव ठाकरेंनी वापरली. फडणवीसांवर शारीरिक विनोद करण्याचीही खुमखुमी अनेकवेळा उद्धव ठाकरेंना आल्याचे पाहायला मिळाले. भाषणासाठी समोर बसलेल्या लोकांनीही फडणवीसांना शरीरावरून काहीबाही बोलावे यासाठी त्यांना उचकावण्याचे उद्योग उद्धव ठाकरेंनी केले. कधी फडतूणवीस, कधी टरबुजा म्हणत उद्धव ठाकरेंनी आपण सोशल मीडियावर पडीक बसलेल्या लोकांप्रमाणे टिप्पण्ण्या केल्या. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना केंद्रातील लोकांकडून चावीने चालविली जाणारी माकडे म्हणण्यापर्यंत उद्धव ठाकरेंची मजल गेली.

या ज्या सगळ्या उपमा दिल्या जात होत्या, या काही राजकीय विरोधातून नव्हत्या हे कुणालाही पटेल. हा होता तो निव्वळ द्वेष आणि फडणवीस यांच्याप्रती असलेली मत्सराची भावना. राजकीय विरोध असता तर तो फडणवीसांच्या राजकीय विधानांपुरता किंवा त्यांच्या निर्णयांपुरता राहिला असता पण तसे काही झाले नाही. हा विरोध फडणवीसांशी जणू काही आपले खाजगी वैर आहे, आपली दुश्मनी आहे, या पद्धतीचा राहिला. त्यामुळे संजय राऊत कितीही म्हणाले तरी उबाठा गटाने जी काही विधाने फडणवीसांबद्दल केली आहेत, ती केवळ राजकीय विऱोधातून नाहीत तर फडणवीसांची यथेच्छ बदनामी करण्यासाठीच केलेली आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. तसे नसते तर गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या भल्यासाठी विचार करत असल्याचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली असती. आदित्य ठाकरेंनी उद्योग व घोटाळ्यांच्या आरोपांबाबत फडणवीसांना अवगत केले असते. पण त्यावेळी पत्रे राज्यपालांना लिहायची, आयुक्तांना लिहायची किंवा मीडियातच त्याविषयी पोस्ट टाकून आपण महाराष्ट्रासाठी किती चिंतित आहोत, हे दाखविण्याचा आटापिटा केला गेला.

जर खरोखरच केवळ फडणवीसांचा राजकीय विरोध असता तर अनेकवेळा उद्धव ठाकरे गटाकडून कुणीतरी फडणवीसांना भेटून समस्यांबद्दल त्यांच्याशी चर्चा केली असती पण तसे काही झालेले नाही. एकीकडे याच महाविकास आघाडीतील शरद पवारांनी मात्र कधीही मोदी सरकारवर टीका केली तरी त्यांच्याशी संवादाचा मार्ग खुला ठेवला. ते उद्धव ठाकरेंना शक्य झाले नाही, कारण फडणवीस यांच्याशी असलेले वैर हेच त्याला कारणीभूत होते. त्यामुळे आज कितीही त्याला राजकीय विरोध म्हटले जात असले तरी ते वैरच आहे हे पुरेसे स्पष्ट आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा