जरांगेंच्या आंदोलनामागून पवार, ठाकरे माथी भडकवतात!

पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंचा इशारा

जरांगेंच्या आंदोलनामागून पवार, ठाकरे माथी भडकवतात!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यावर बीडमध्ये सुपाऱ्या फेकून घोषणाबाजी झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणावरून राज ठाकरे यांनी आक्रमक होत पत्रकार परिषद घेऊन उबाठा गट आणि शरद पवार गटावर जोरदार निशाणा साधला.

पुढच्या तीन साडेतीन महिन्यात त्यांना दंगली घडवायच्या आहेत. फक्त मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.शरद पवार यांचं राजकारण पाहिलं तर जेम्स लेन प्रकरणापासून सुरू केलं. ते स्टेप बाय स्टेप सुरू आहे. जातीबद्दल प्रेम वर्षानुवर्ष आहे. फक्त महाराष्ट्रात नाही, देशातही आहे. पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी सुरू केलं, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्याऐवजी जातींचं राजकारण केलं जातंय

आरक्षणाच्या संदर्भात आपण केलेल्या विधानावर जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या आल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. “मी सोलापूरमध्ये जे बोललो, ते सगळ्यांनी पाहिलं, ऐकलं. पण त्यानंतर जाणीवपूर्वक केलेल्या बातम्या धक्कादायक होत्या. राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध वगैरे. वाट्टेल त्या बातम्या आल्या. २००६ साली पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत आमची एकच भूमिका राहिली आहे. आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषांवर द्यावं. त्यावर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही,” असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच ते म्हणाले की, देशात महाराष्ट्रासारखं दुसरं राज्य नाहीये. इथे इतक्या गोष्टी उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यातल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळत असताना आमच्या मुला-मुलींना त्या गोष्टी इथे मिळत नाहीत. आपण जर इथल्या मुलांसाठी या गोष्टी नीट वापरल्या तर आपल्याकडे आरक्षणाची गरजच नाहीये. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्याऐवजी आपल्याकडे फक्त जातींचं राजकारण केलं जातं आणि माथी भडकवली जातात, असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

आंदोलनाच्या मागून शरद पवार, उद्धव ठाकरे राजकारण करतायत

तसेच राज ठाकरेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, “माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीही संबंध नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत. मराठवाड्यातले काही पत्रकारही त्यात सहभागी आहेत. धाराशिवमध्ये लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार करत होते. मी तिथल्या लोकांना वर बोलवत असताना पत्रकार म्हणत होते खाली या. तिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे काही लोक होते,” असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

ठाकरे, पवारांना झालेलं मतदान प्रेमापोटी नसून मोदी विरोधातून झालं

“बीडमध्ये काल जे झालं त्यात उबाठा गटाचा जिल्हाप्रमुखच होता. लोकसभेच्या निर्णयानंतर यांना वाटलं की मराठवाड्यात मतदान झालं. पहिली गोष्ट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी समजून घेतली पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात झालेलं मतदान होतं. विरोधकांच्या प्रेमाखातर झालेलं मतदान नव्हतं. त्यामुळे मुस्लीम समाजानं देशभरात मोदींविरोधातली मतं दिली. दलित बांधवांनी भाजपाच्या विरोधात मतं दिली. पण या दोघांना वाटतंय की यांच्या प्रेमाखातर ते मतदान झालंय. त्यांना वाटतंय येत्या निवडणुकीतही अशीच खेळी करावी,” असं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा..

भारतात आश्रय मिळविण्यासाठी बांगलादेशच्या सीमेवर हिंदू पाण्यात उभे

बांगलादेशी हिंदू ढाक्याच्या रस्त्यावर !

“माझ्या आईचे प्राण वाचवल्याबद्दल भारतासाठी कृतज्ञ”

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड

शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याची चिंता करायला हवी

“शरद पवारांसारखा ८३ वर्षांचा माणूस वक्तव्य करतो की, महाराष्ट्राचा मणिपूर होईल? या लोकांनी मणिपूर होऊ नये याची चिंता करायला हवी. पण ते असं म्हणत असतील तर यांच्या डोक्यात काय असेल याची कल्पना करावी. पुढच्या तीन साडेतीन महिन्यात यांना मराठवाड्यात ज्या काही गोष्टी घडवायच्या असतील, त्या घडवण्यासाठी यांच्या या सगळ्या गोष्टी चालू आहेत,” असा आरोप राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला. “माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करून नका. माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर सभाही घेता येणार नाहीत, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही,” असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, शरद पवारांना इशारा दिला आहे.

Exit mobile version