राहुल गांधींनी शेगावमध्ये सावरकरांबद्दल बोलणे टाळले

संजय राऊत यांनी मविआत फूट पडण्याचा इशारा दिला होता

राहुल गांधींनी शेगावमध्ये सावरकरांबद्दल बोलणे टाळले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेगावमध्ये भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलणे टाळले. महाराष्ट्रात सध्या पदयात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी विविध ठिकाणी सभा घेत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी सावरकरांच्या बाबतीत आरोप केले होते. त्यावरून महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला. अनेक ठिकाणी आंदोलने झाली. उद्धव ठाकरे गटाने राहुल गांधींकडून सावरकरांवर होणारी टीका योग्य नाही, असे विधान केले होते. तसेच अशीच टीका सावरकरांवर होत राहिली तर महाविकास आघाडीत फूट पडेल, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे शेगावमधील सभेत ते पुन्हा सावरकरांबद्दल बोलणार का, याविषयी चर्चा होती. मात्र राहुल गांधी यांनी सावरकर हा विषयच टाळला.

शेगावमधील सभा उधळून लावू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. त्यानुसार मनसे कार्यकर्ते शेगावला पोहोचले होते पण त्यांना वाटेतच अडविण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी भर सभेत काळे झेंडे दाखवले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करत महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांची पत्रे शेअर केली आणि राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी आव्हान दिले.

हे ही वाचा:

सावरकरांसाठी ठाकरे गट सत्ता सोडू शकत नाही

निवडणूक अधिकाऱ्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आणि बसला दणका

दहशतवादाच्या आर्थिक मदतीच्या मुळावरच घाव घालणार

आफताबने केलेल्या मारहाणीमुळे श्रद्धा दोन वर्षांपूर्वी ‘ऍडमिट’ होती

 

सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतले, त्यांनी इंग्रजांना माफीनामे लिहून दिले असे आरोप करत राहुल गांधींनी आपल्या पदयात्रेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झाले होते. त्यावरून राहुल गांधींविरोधात महाराष्ट्रात आंदोलने झाली. अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्याचे प्रकार झाले. उद्धव ठाकरे यांनी आपण राहुल गांधी यांच्या विधानाशी सहमत नाही असे म्हटले होते पण बाकी टीका त्यांनी टाळली होती. संजय राऊत यांनी मात्र सावरकरांबद्दल राहुल गांधींनी हे बोलण्याची गरज नव्हती असे विधान करत अशा विधानांमुळे महाविकास आघाडीत फूट पडेल असा इशाराही दिला.  खरे तर याआधीही राहुल गांधींनी सावरकरांबद्दल विधाने केलेली आहेत. पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिक्रिया उमटल्या नव्हत्या.

या सभेतही राहुल गांधी यांनी भाजपाला पुन्हा लक्ष्य केले. शिवाय, महागाई, बेरोजगारी, वाढता द्वेष, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवरच भाष्य केले.

Exit mobile version