जनतेचा एकच पुकार, देशात पुन्हा मोदी सरकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

जनतेचा एकच पुकार, देशात पुन्हा मोदी सरकार

राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएची बैठक दिल्लीमध्ये मंगळवार, १९ जुलै रोजी पार पडली. भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी एनडीएची वाटचाल कशी असेल यावर भाष्य केले. आगामी निवडणुकीतील रणनीती काय असणार आहे यावरही त्यांनी भाष्य केले आहे.

“आमची एकजूट आहे आणि एकमतही! संकल्प ३३०+ विजयाचा, निर्धार प्रगतीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी एनडीए नेत्यांची बैठक पार पडली. दिल्लीत झालेल्या या बैठकीमध्ये एनडीएने केलेले ठराव मांडण्याची संधी मिळणे हे भाग्य समजतो,” अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३३० हून अधिक जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. एनडीए पक्षांची एकजूट हा संकल्प सिद्धीस नेईल, हा विश्वास आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या दूरदृष्टीने १९८९ मध्ये भाजप-शिवसेनेची युती आकाराला आली. विचारधारेचा भक्कम पाया आणि काँग्रेसला कडवा विरोध हा या मैत्रीचा आधार होता. भाजप – शिवसेनेच्या या मैत्रीला आणि विचारांवर आधारित एकजुटीला आता ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तर, एनडीएच्या स्थापनेला २५ वर्षे झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे नेतृत्व आणि अमित शहाजी, जे. पी. नड्डाजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मैत्री दृढ झाली आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

“आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवून बलशाली, नवा भारत घडवण्यासाठी ३३० हून अधिक जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा भारताचे नागरिक एनडीएला आणि पर्यायाने नव्या भारताच्या समृद्ध वाटचालीला कौल देतील हा ठाम विश्वास आहे. जनतेचा एकच पुकार, देशात पुन्हा मोदी सरकार,” असा निर्धार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

बैठकीतील फोटोची सर्वत्र चर्चा

भाजपकडून दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर पक्षांचे देखील नेते गेले होते. या बैठकीत एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं पाहायला मिळालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. तर, अमित शहा यांच्या बाजूला अजित पवार बसले होते. या बैठकीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आल्याचं चित्र होतं.

हे ही वाचा:

जगविख्यात मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन

भागवत कराड घेणार सात कोटींचे घर

आंदोलनकर्त्या विनेशविरोधात युवा कुस्तीगीराची लढाई न्यायालयात

देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यात दोन जणांना घेतलं ताब्यात

या बैठकीतील फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर निरनिराळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’, ‘महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार नाही’, ‘महाराष्ट्राच्या शिलेदारांना मानाचे स्थान’ अशा आशयाच्या प्रतिक्रिया लोकांकडून येताना दिसत आहेत.

Exit mobile version