नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार दणका मिळाला आहे. ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गुरुवार, १७ मार्च रोजी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत झालेल्या निर्णयात नवाब मलिक यांच्याकडून राजीनामा घेतला नसला तरी त्यांच्याकडून मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आला आहे. त्यानंतर बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्यणानुसार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे कौशल्य विकास आणि रोजगार या विभागाचा कार्यभारही सोपवण्यात आला आहे.

या दोन विभागांबरोबरच नवाब मलिक यांच्याकडे असणारी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही काढून घेण्यात आलीय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. तर परभणीचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचे काम दोन-चार दिवसांत पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचे ठरवल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले.

हे ही वाचा:

तीन कोटी द्या, मग मिळेल नवाब मालिकांना जामीन!

हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’

गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास

या गायिकेला पंकजा मुडेंनी घेतले दत्तक!

नवाब मलिक हे मुंबईचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. मात्र, ही जबाबदारीही त्यांच्याकडून काढून घेण्यात आली असून कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रस्तावासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी सांगितली.

ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी न्यायालयात धाव घेऊन ही अटक चुकीच्या पद्धतीने केल्याचे म्हटले होते, मात्र, दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाने नवाब मलिक यांना दणका देत ईडीने केलेली अटक कायद्यानुसारच असल्याचे म्हणत त्यांची याचिका फेटाळून लावली.

Exit mobile version