आरोपीला भरचौकात फाशी द्या मागणी करणाऱ्यांची आपुलकी कशी वाढली?

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी नरेश म्हस्के यांनी विरोधकांना सुनावले

आरोपीला भरचौकात फाशी द्या मागणी करणाऱ्यांची आपुलकी कशी वाढली?

बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला आणि यात पोलीस जखमी झाले. यानंतर पोलिसांनी स्व संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला, अशी माहिती आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. यावर आता शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना सुनावले आहे.

नरेश म्हस्के यांनी ट्वीट करत म्हटले की, “बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसाची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात तीन पोलिस त्यात जखमी आहे. पोलिसांनी स्व संरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला. परंतु, विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे,” अशी खंत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : 

अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी- झेलेन्स्की भेट; संघर्षाचे निराकरण करण्यावर भर

तीन बांगलादेशी नागरिकांसह दोन भारतीय दलालांना अटक

गाझियाबादमध्ये लघवी-थुंकीच्या कारनाम्यांविरोधात हिंदू संघटनांची महापंचायत, बहिष्काराची घोषणा!

रोहित पवार, जरांगेंना शुगर फ्री ज्युस घेऊन जा!

पुढे ते असेही म्हणाले की, “जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम रहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी आम्ही ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली. आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करताय. आता पोलिसांवर आरोप करणे ही दुटप्पीपणी हद्द झाली आहे. या आरोपीला भरचौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली?” असे संतप्त सवाल नरेश म्हस्के यांनी विचारले आहेत.

Exit mobile version