पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, ३ जुलै रोजी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळावारी लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना विरोधक आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. राज्यसभेत बोलतानाही नरेंद्र मोदींनी काँग्रेसला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
सरकार येऊन दहा वर्षे झाली आहेत आणि अजून २० वर्षे बाकी
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भ्रम पसरवणाऱ्यांचं राजकारण देशवासीयांनी नाकारले आहे. विरोधकांना ही चपराक आहे. आमचं सरकार येऊन दहा वर्षे झाली आहेत आणि अजून २० वर्षे बाकी आहेत, असा ठाम विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. अनेक दशकांनंतर एखाद्या सरकारला सलग तिसऱ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी विकसित भारताची, स्वावलंबी भारताची वाटचाल स्वीकारून हा संकल्प पुढे नेण्याचा आशीर्वाद दिला आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
संविधान केवळ लेखांचा संग्रह नसून त्याचा आत्माही महत्त्वाचा
“देशवासीयांनी गोंधळाचे, भ्रमाचे राजकारण नाकारले असून विश्वासाचे राजकारण मान्य केले आहे. सार्वजनिक जीवनात माझ्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांच्या कुटुंबातून सरपंचही झाले नाहीत आणि राजकारणाशीही संबंध नाही. पण आज ते महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत. याचे कारण डॉ. बाबासाहेबांनी दिलेले संविधान आहे. आपल्यासाठी संविधान हा केवळ लेखांचा संग्रह नाही, तर त्याचा आत्माही खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत संविधान आपल्याला मार्गदर्शन करण्याचे काम करते,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांनी संविधान दिनाला केला होता विरोध
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करू, असे आमच्या सरकारच्यावतीने लोकसभेत सांगण्यात आले, तेव्हा संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन असताना याची काय गरज, असं म्हणत निषेध केला याचे आश्चर्य वाटते. संविधान दिनाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेचा आत्मा आणि तिच्या निर्मितीतील भूमिका याविषयी चर्चा व्हावी, राज्यघटनेवरील विश्वासाची भावना व्यापकपणे जागृत व्हावी आणि संविधान हीच आपली सर्वांत मोठी प्रेरणा राहील, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
भाजपाचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीत
पुण्यात झिका रुग्णांची संख्या सातवर
शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप; सेन्सेक्सची ८०,००० पार उसळी
अमरनाथ यात्रेकरूंसाठी लष्कराचे जवान बनले देवदूत; ब्रेक फेल झालेल्या बसला थांबवण्यात यश
भारताला पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर नेण्याचा जनादेश
नरेंद्र मोदी म्हणाले की, “ही निवडणूक केवळ गेल्या १० वर्षांच्या कामगिरीवर मंजुरीचा शिक्का नाही तर भविष्यातील धोरणांवरही मान्यता देणारा शिक्का आहे. देशातील जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याने आम्हाला संधी देण्यात आली आहे. गेल्या १० वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेला १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेण्यात यश आले आहे. कोरोनाचा कठीण काळ आणि जागतिक संघर्षाची परिस्थिती असतानाही भारत आज सक्षम आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेण्यात यश आले आहे. यावेळी देशातील जनतेने भारताला पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर नेण्याचा जनादेश दिला आहे आणि मला विश्वास आहे की, जनतेने दिलेल्या जनादेशामुळे आपण भारताला पहिल्या तीन क्रमांकावर नेऊ,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.