“पूर्वी बेशरमपणे मान्य केलं जायचं की, १ रुपयात ८५ पैशांचा घोटाळा होतोय”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला काँग्रेसवर निशाणा

“पूर्वी बेशरमपणे मान्य केलं जायचं की, १ रुपयात ८५ पैशांचा घोटाळा होतोय”

संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, २ जुलै रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जबरदस्त निशाणा साधला.

२०१४ मध्ये जनतेने निवडून देशाच्या परिवर्तानाचा प्रारंभ केला

नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, “देशाने एक कालखंड पाहिला आहे ज्यावेळी बेशरमपणे मान्य केलं जायचं की, दिल्लीतून एखाद्या प्रकल्पासाठी १ रुपया निघाला की योजनेपर्यंत १५ पैसे पोहचतात. १ रुपयात ८५ पैशांचा घोटाळा होत होता. शिफारस न करता काहीही मिळत नव्हतं. २०१४ पूर्वीचे दिवस आठवले तर देशातील जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला होता. देश पार निराशेच्या गर्तेत बुडाला होता. देशाचे काहीही होऊ शकत नाही, हेच शब्द २०१४ पूर्वी कानावर पडायचे. दररोज वृत्तपत्रांमध्ये फक्त घोटाळ्यांच्या बातम्या यायच्या. गरीबाला घर घेण्यासाठी, गॅस कनेक्शनसाठी लाच द्यावी लागत होती. मोफत रेशनही लोकांना मिळत नव्हतं म्हणून देशाने २०१४ मध्ये आम्हाला निवडलं आणि तो देशाच्या परिवर्तानाचा प्रारंभ होता. १० वर्षांत आम्ही देशाचा आत्मविश्वास परत आणला. आज देशाचा आत्मविश्वास दुणावला आहे, भारत काहीही करु शकतो हे देशातल्या सामान्य माणसाला वाटतं,” असं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

कोळसा घोटाळ्यात अनेकांचे हात काळे झाले होते

देशात एक काळ होता जेव्हा कोळसा घोटाळ्यात अनेकांचे हात काळे झाले होते. पण, आज कोळशाच्या सर्वाधिक उत्पादनाचे विक्रम भारताने केले आहेत. २०१४ च्या आधी फोन बँकिंग करुन बँक घोटाळे करण्यात आले. बँकेची संपत्ती व्यक्तिगत प्रॉपर्टी म्हणून लुटण्यात आली. २०१४ नंतर ही धोरणं सरकारने बदलली. त्यामुळेच आपल्या देशांचं नाव जगातल्या प्रसिद्ध बँकांमध्ये घेतलं जाऊ लागलं, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले.

भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण

देशाने दीर्घकाळ तुष्टीकरणाचे राजकारण पाहिले आणि प्रशासनाचे तुष्टीकरण मॉडेलही पाहिले आहे. जनतेने आमच्या १० वर्षांच्या सरकारचा ट्रॅक रेकॉर्डही पाहिला. लोकसेवा हीच ईश्वर सेवा, हा मंत्र बनवून आम्ही काम केले आहे. देशातील जनता भ्रष्टाचाराने त्रस्त होती. आम्ही भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण राबवले. आज जगात भारताचा गौरव होतोय. भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. गेल्या १० वर्षात आमचे सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राचे पालन करत आहे. नेशन फर्स्ट, हे आमचे ध्येय आहे,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी यावेळी दिला आहे.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत २७ जणांचा मृत्यू

धर्मांतर होत राहिल्यास देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल

बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ विश्वचषक घेऊन मायदेशी येण्यास सज्ज!

राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ

विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विकसित भारताचा संकल्प घेऊन आम्ही गेलो होतो आणि हाच संकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला जनतेने सेवा करण्याची संधी दिली. जेव्हा देशाचा विकास होतो, करोडो लोकांची स्वप्ने पूर्ण होतात, तेव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मजबूत पाया तयार होतो. जगाच्या विकासाच्या प्रवासात भारताचाही वाटा समान असेल, हे स्वप्न आहे. देशवासियांना आश्वासन देतो की, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणाने सर्वतोपरी प्रयत्न करू, असा दावा नरेंद्र मोदींनी भाषणात केला आहे.

Exit mobile version