मुसलमान समाजाकडून देशातील लसीकरणाला अल्प प्रतिसाद

मुसलमान समाजाकडून देशातील लसीकरणाला अल्प प्रतिसाद

भारतात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झालेली आहे. या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना सरकसकट लस दिली जाणार आहे. असे असताना काही अहवालांनुसार देशातल्या मुस्लिम बहुल भागातून मात्र लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

द न्यु इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार जमिनीवर काम करत असलेले आरोग्य कर्मचारी आणि तज्ञांच्यामते बंगळुरूतील मुस्लिम बहुल क्षेत्रात लसीकरणाबाबत विशेष उत्साह दाखवण्यात आलेला नाही. प्रशासनाकडून सातत्याने लसीकरणाबाबत जागृती मोहिम राबवली जात असूनही लसीकरणाकडे एकंदरितच पाठ फिरवलेलीच पहायला मिळाली.

हे ही वाचा:

मुंबईत दोन शिफ्टमध्ये लसीकरण

जीएसटीचे आजवरचे सर्वाधिक उत्पन्न गोळा

गॅसमुळे गरम झालेल्या सामान्यांच्या खिशाला किंमत घसरणीचा थंडावा

डॉ. गिरीधर आर बाबू या साथरोगतज्ञांच्या मते, अल्पसंख्यांक समाजाशी सांस्कृतिक दृष्ट्या असंवेदनशीलतेने आणि अयोग्य रितीने संवाद साधल्यास परिस्थिती आणखी चिघळेल. एका अहवालानुसार अनेक धार्मिक नेत्यांनी याचे खापर या मोहिमेबाबत पुरेशी जनजागृती न केल्याबद्दल सरकारवरच फोडले आहे. वास्तवात सरकारकडून सातत्याने लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

मौलानांनी देखील सरकारने लोकांनी एकत्र येऊ नये आणि लसीकरण करून घ्यावे याबाबत परिपत्रक न काढल्याबद्दल सरकारला दोष दिला होता, परंतु सरकारकडून एकत्र न येण्याबाबत सातत्याने सांगण्यात आले आहे.

देशाच्या इतर भागात देखील अशीच अवस्था आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार अनेक वेळा जनजागृती मोहिमा राबवून सुद्धा मुस्लिम समाज लस टोचून घेण्याबाबत शंकित आहे. हाजी असरत बेग या मुस्लिम बहुल मक्तमपुरामधील काँग्रेस नगरसेवकाच्या मते, मुसलमान ज्याप्रमाणे चाचणी करून घेण्यास शंकित होते, त्याप्रमाणे ते लस घेण्यास देखील साशंकित आहेत.

असरतबेग यांच्या मते मुसलमानांमधील भिती ही लसीच्या दुष्परिणामांमुळे आहे. एएमसीने इम्रान खेडावाला आणि गियासुद्दीन शेख या आमदारांना लस घेऊन लसीबाबतच्या शंका दूर करण्याची विनंती केली, मात्र त्यांच्यापैकी कोणीही लस घेतली नाही.

सुरत आणि गोध्रा येथे देखील असेच प्रकार पहायला मिळाले. येथे मशिदींमधून तर धार्मिक नेत्यांमार्फत लस घेण्याबाबत जागृती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मागील वर्षी अनेक मुसलमान दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथे तबलिघी जमातमध्ये गेले होते. त्यापैकी अनेक कोरोना चाचणीत पॉजिटिव्ह आढळले होते. त्यांच्यापैकी काहींनी नंतर त्यांची चाचणी करायला गेलेल्या डॉक्टरांवर हिंसक हल्ले केले होते. यापैकी क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झालेल्या कित्येकांनी तिथे देखील सामाजिक बेशिस्तीचे दर्शन घडवले होते. तबलिघी जमात हा मार्च २०२० मध्ये देशातील पहिला सामुहिक प्रसारास कारणीभूत ठरलेला कार्यक्रम ठरला होता.

Exit mobile version