लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान काल(२० मे) पार पडले.राज्यातील मतदारांनी मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती.परंतु, मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रावर दिरंगाई होत असल्याचे दिसून आले.यावरून उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि पंतप्रधान मोदी सरकारवर टीका केली.उद्धव ठाकरेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देत, उद्धव ठाकरेंचे हे नेहमीचेच रडगाणे असल्याचे म्हणाले.यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरे कुटुंबावर टीका केली आणि पराभवाच्या भीतीने ४ जूननंतर हे ठाकरे कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीत असल्याचा टोलाही लगावला.
नितेश राणे म्हणाले की, पराभव काय असतो? हे उद्धव ठाकरेंच्या आणि संजय राऊत यांच्या चेहऱ्यावरून आता समजते.४ जूननंतर देशात पुन्हा पंतप्रधान मोदींचे सरकार येतंय हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या आणि आज सकाळी पार पडलेल्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतल्या रडगाण्यावरून स्पष्ट सिद्ध झाले आहे.
निवडणुकीच्या मैदानात हे सपशेल पूर्णपणे तोंडावर आपटले आहेत.त्यामुळे गृहविभागाला माझी विनंती आहे की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबांचे पासपोर्ट लवकरात लवकर जप्त करावे.कारण, ४ जूननंतर पराभव होणार हे आता सिद्ध झाले आहे.त्यामुळे ठाकरे कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीत आहे, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव कुटुंबियांना लगावला.
हे ही वाचा:
धोनी मुख्य प्रशिक्षकासाठी स्टीफन फ्लेमिंगचे मन वळविणार?
आधी ‘लेडी सिंघम’ होते, आता भाजपाची एजंट? स्वाती मालीवाल यांचा सवाल
सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ
इंडी आघाडी देशाचे विभाजन करणारी, ते देशाला पुढे काय नेणार?
भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप असल्याने उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीत आहेत.म्हणून पोलीस खात्याने ठाकरे कुटुंबियांच्या नावाने लुक आऊट नोटीस काढावी आणि त्यांचे पासपोर्ट जप्त करावे, अशी मागणी असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
ज्या पद्धतीने राज्यात काल मतदान झाले त्यावरून स्पष्ट दिसते की, महायुतीला राज्यातील लोकांनी मनापासून स्वीकारले आहे.आमच्या पक्षाचे सगळेच उमेदवार घासून नाहीत ठासून निवडणूत येणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कालपासून रडगाणे सुरु झाले आहे.राज्यात महायुती ४५ प्लस आकडा गाठणार, हे विरोधकांच्या रडगाण्यावरून दिसून येते, असे नितेश राणे म्हणाले.