छत्रपती शिवाजी महाराजांनी उठाव केला होता, आम्हालाही करावा लागेल !

मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यात दिला इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांनी उठाव केला होता, आम्हालाही करावा लागेल !

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील श्री क्षेत्र नगद नारायण गडावर पहिला जाहीर दसरा मेळावा पार पडला. या सभेत जरांगे पाटील यांनी विधानसभेपूर्वीच सरकारसह विरोधकांना टीका केली. मेळाव्यात सुमारे ५०० एकर परिसरात लाखो मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारवर टीका केली. आचारसंहितेच्या आत निर्णय घ्या. आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

“जर अडवणूक झाली तर उठाव करावाच लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील उठाव केला होता, आपल्याला सुद्धा अन्यायाविरुद्ध लढा उभारावा लागणार आहे,” असं भाष्य मनोज जरांगे यांनी केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. आमच्या समाजाने राज्याच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी खूप संघर्ष केला आहे. तलवारी हातात घेऊन लढलो, मान कापली गेली, पण कधीच हार मानली नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले. मराठा समुदायावर संस्कार आहेत. हा समुदाय कधीही कोणावर जातीभेद करत नाही. हा समुदाय मस्तीत, मग्रुरीत वागला नाही. या समाजाने प्रत्येकाला साथ देण्याचं काम केलं. या समाजाने कधीच जातीवाद केला नाही. या समाजाला जात कधी शिवली नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जर न्याय मिळाला नाही तर आपल्याला यावेळी उलथापालथ करावी लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. आपल्या नाकावर टिच्चून कुठला निर्णय होणार असेल आणि या राज्याच्या समाजावर अन्याय होणार असेल तर गाडावच लागणार. शेवटी आपल्याला आपला समूदाय महत्त्वाचा आहे. आपल्यासाठी आपला शेतकरी महत्त्वाचा आहे, असं जरांगे म्हणाले.

हिंदू धर्माने अन्यायाविरोधात लढायला शिकवलं. कायदा आणि संविधानाने अन्यायाविरोधात लढण्याचं शिकवलं आहे. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे संविधानाने शिकवलं आहे. गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून उठाव चालू आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी केली जात आहे आणि इथे जातीचा संबंध नाही. आम्ही १४ महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत. तुमच्यामुळे आरक्षणाला धक्का लागत आहे, असे काहीजण सांगत आहेत.

हे ही वाचा:

हरयाणा भाजपा सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!

भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजकडे डीएसपी पदाची जबाबदारी

भारत सामर्थ्यशाली होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू

हिज्ब-उत-तहरिर आता दहशतवादी संघटना!

मला संपवण्यासाठी अनेक षडयंत्र रचण्यात आले आहेत. मला पूर्ण घेरले आहे. मी या गडावरून एकही शब्द खोटं बोलणार नाही. मला होणाऱ्या वेदना माझ्या समजाला सहन होत नाहीत. समाजाला होणाऱ्या वेदना मलाही सहन होत नाहीत. पण नाईलाज आहे. या राज्यातील सर्व बांधवांना सांगतो की तुमच्यामुळं कलंक लागू देऊ नका. पक्ष-पक्ष करू नका. सारखं नेता नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका. तुमचे लेकरं अधिकारी बनलेले पाहायचे आहेत. आपले लेकरं प्रशासनात जाऊ द्यायचे नाही, अशी लोकांची इच्छा आहे. मात्र आपले लेकरं प्रशासनात घातल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपल्याला डावललं जातंय, असंही मनोज जरांगे म्हणाले.

Exit mobile version