ममता म्हणतात, बंगाल पेटले तर दिल्लीही पेटेल!

कोलकात्यातील आंदोलनांमुळे ममता बॅनर्जी भडकल्या

ममता म्हणतात, बंगाल पेटले तर दिल्लीही पेटेल!

कोलकात्यात झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर पश्चिम बंगालमधील संताप शमण्याची चिन्हे नाहीत. ममता बॅनर्जी सरकारविरोधात जोरदार आक्रोश होत असून त्यामुळे ममता बॅनर्जी चांगल्याच अस्वस्थ झालेल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकावले आहे. तुम्ही जर आगीशी खेळाल तर ती आग बंगालमध्येच नाही तर दिल्लीतही पसरेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

त्या म्हणतात की, बंगाल म्हणजे बांगलादेश नव्हे. माझे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. येत्या १० दिवसांत आपण विशेष अधिवेशन बोलावणार असून त्यात बलात्कारविरोधी कायदा आणण्यात येईल, असेही ममतांनी सांगितले आहे. असा गुन्हा करणाऱ्यांना देहदंडाची शिक्षा नमूद करण्यात येईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.

त्याचवेळी ममतांनी भाजपाला इशारा दिला आहे की, मी जर संयम गमावला तर मी काय करू शकते त्याचा तुम्ही विचार करा. तुम्ही माझा खूप अपमान केला आहे. माझा खूप अनादर केला आहे. मी त्याचा सूड उगवलेला नाही. ममतांनी आपल्या कार्यकर्त्यांना फेक न्यूजपासून सावध राहण्याचे आणि त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा:

बृजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यास नकार

गजा मारणेच्या हातून सत्कार स्वीकारताच चंद्रकांत पाटील बनले टीकेचे धनी

पुण्यात २२ वर्षी नौशाद चालवत होता बनावट टेलिफोन एक्स्चेंज

जम्मू काश्मीरमधील दोन चकमकींमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

ममता म्हणाल्या की, आम्हाला बदल हवा आहे, बदला नको असे मी म्हटले होते. (२०११च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने हा नारा दिला होता) पण आता मी सांगते की, ते विसरा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मला अराजक नकोय पण जर एखाद्याकडून सातत्याने बदनामी होत असेल, खोट्य़ा बातम्या दिल्या जात असतील, कारस्थाने रचली जात असतील आणि तरीही तुम्ही उत्तर दिले नसेल तरी तुम्ही त्याविरोधात सज्ज आहात हे दाखवले पाहिजे.

ममतांनी आंदोलनातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना विनंती केली की, त्या डॉक्टरांच्या भावनेचा आदर करतात पण त्यांनी आता कामावर यायला हवे.

Exit mobile version