राहुल गांधी आता ‘ट्रोल’ पुरते उरले!

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले उत्तर, राहुल गांधीवर साधला निशाणा

राहुल गांधी आता ‘ट्रोल’ पुरते उरले!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाच नेत्यांची नावे घेत त्यांचा उद्योगपती गौतम अदानींशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे आणि राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी सोमवारी एक ट्विट करत त्यात अदानी या शब्दातून पाच नेत्यांची नावे लिहिली होती. हे नेते काँग्रेस सोडून भाजपात गेले आहेत अथवा काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. त्यात गुलाम नबी आझाद, किरण कुमार रेड्डी, अनिल अँटनी, ज्योतिरादित्य शिंदे, हिमंता बिस्वसर्मा यांच्या नावांचा समावेश होता. त्यावरून ज्योतिरादित्य यांनी राहुल गांधींना निशाणा केले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी हे आता फक्त ट्रोल म्हणूनच शिल्लक राहिले आहेत.   ज्योतिरादित्य यांनी तीन सवाल ट्विटद्वारे राहुल गांधींना विचारले आहेत.

ज्योतिरादित्य यांनी म्हटले आहे की, बहुजन समाजातील एका वर्गाबाबत टिप्पणी केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी का मागितली नाही. त्याऐवजी मी सावरकर नाही, मी गांधी आहे माफी मागणार नाही, असे राहुल गांधी म्हणतात. एका देशभक्ताचा अपमान करतात. किती हा अहंकार?

ज्योतिरादित्य यांनी असाही सवाल उपस्थित केला की, काँग्रेस नेहमीच न्यायालयाकडे बोट दाखविते. स्वार्थासाठी तुम्ही न्यायालयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न का करता? तुमच्यासाठी नियम वेगळे का हवेत? तुम्ही स्वतःला देशाचे पहिल्या दर्जाचे नागरीक वगैरे समजता की काय? पण या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडून अपेक्षित नाहीत कारण हे प्रश्न तुमच्या आकलनापलिकडचे आहेत. तुमच्या डोक्यात अहंकार ठासून भरला आहे.

हे ही वाचा:

मोबाईल फोन काढून घेतला म्हणून केली आत्महत्या

सावरकर जयंती आता स्वातंत्र्यवीर गौरव दिन!

एकेकाळी सिलिंडर उचलणाऱ्या रिंकूने आयपीएलमध्ये शिवधनुष्य उचलले

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द; तृणमूलही आता प्रादेशिक पक्ष

राहुल गांधी यांनी ज्या नेत्यांची नावे घेतली त्यापैकी हिमंता बिस्वसर्मा यांनी राहुल गांधींवर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यावरून काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की, तुम्ही काँग्रेसमध्ये होतात त्यावेळी सत्ता उपभोगली पण आता संधी मिळाली म्हणून भाजपामध्ये प्रवेश केला.

Exit mobile version