या विधानसभा निवडणुकीत ‘फेक नरेटिव्ह’ चालणार नाहीत!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले मत

या विधानसभा निवडणुकीत ‘फेक नरेटिव्ह’ चालणार नाहीत!

लोकसभा निवडणुकीत आरक्षण रद्द करणार, संविधान बदलणार अशा पद्धतीचे फेक नरेटिव्ह चालविण्यात आले. त्यात यशही आले पण आताच्या विधानसभा निवडणुकीत हे फेक नरेटिव्ह अजिबात चालणार नाहीत. लोक मतदानातून उत्तर देतील, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. एका मुलाखतीत बोलताना फडणवीसांनी विविध विषयांना स्पर्श केला.

ते म्हणाले की, प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. भारतात नेहमीच मतदारांनी सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. हरयाणात भाजपाचा दारुण पराभव होणार, असे सांगितले जात असताना वेगळेच चित्र दिसले. आपल्याकडील निवडणुकांचा अंदाज बांधणे सोपे नसते. लोकसभेत मविआला महाराष्ट्रात जे यश मिळाले ते फेक नरेटिव्हच्या आधारावर मिळवता आले. त्यावेळेसच मी सांगितले की, मविआ आणि युतीत ०.३ टक्क्याचा फरक होता. मी सांगितले होते की, फेक नरेटिव्हला आम्ही उत्तर देणार. आरक्षण जाणार, संविधान बदलणार हे नरेटिव्ह आम्ही उघड करणार. राहुल गांधींनी परदेशात जाऊन आरक्षण कसे संपविणार हे सांगितले. त्यातून त्यांच्या या नरेटिव्हची हवा निघून गेली. त्यामुळे आता हा नरेटिव्ह संपला आहे.

वोट जिहादबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, वोट जिहाद हा महत्त्वाचा घटक होता. सगळी धार्मिक स्थळं एकत्र येऊन वोट जिहादचा नारा देत होते. एकगठ्ठा मते पाहायला मिळाली. पण याचा फायदा आता होणार नाही. लोकसभा मतदारसंघातील पाच मतदारसंघात आम्ही पुढे होतो. पण मालेगावमध्ये आम्हाला मते मिळाली नाहीत. पण आता ज्या मतदारसंघात आम्हाला भरघोस मते मिळाली तिथे वोट जिहाद पॅटर्न दिसणार नाही. वोट जिहादमुळे बहुसंख्य समाजाला कळले की जर केवळ मोदी नको म्हणून वोट जिहाद करणार असेल तर त्याला थेट उत्तर मतदानातून उत्तर देता येईल. हादेखील नरेटिव्ह आता चालणार नाही. या निवडणुकीत फेक नरेटिव्ह चालणार नसल्याने आमचा विजय पक्का आहे.

हे ही वाचा:

बाबा सिद्दीकी प्रकरणी अटक केलेला आरोपी सुजित सुशील सिंगकडून धक्कादायक माहिती उघड!

वयाच्या ६ व्या वर्षी घडला गुन्हा, १७ वर्षाची झाल्यावर केली तक्रार ,४ तासात मौलवीला केले गजाआड!

काँग्रेस महाविकास आघाडीत राहील असे वाटत नाही!

कराचीमधून अपहरण झालेले आठ बलुच विद्यार्थी घरी परतले!

फडणवीसांनी आपल्या व्हीजनबद्दल सांगितले की, मी दीर्घकाळाचा विचार करणारा नेता आहे. अडीच वर्षात विजेची स्थापित क्षमता ४० हजार मेगावॅट आहे. ती ४४ हजार मेगावॅट करण्यासाठी करार केलेले आहेत. त्यातील २२ हजार मेगावॅटचे काम सुरू झाले आहे. याचे परिणाम म्हणजे २०३०मध्ये महाराष्ट्रात ५२ टक्के वीज अपारंपारिक स्रोतातून येईल कोळसा, तेल आयात करण्याची गरज राहणार नाही. शेतकऱ्याला जी मोफत वीज दिलेली आहे, त्याचा १४ हजार कोटींचा भार पडतो. ती वीज आपल्याला ३ रुपयांना पडणार आहे. १५ हजार कोटी वाचणार आहेत. शेतकऱ्याला जन्मभर मोफत वीज देता येईल अशी व्यवस्था करणार आहोत.

वाढवण बंदर योजनेबद्दल ते म्हणाले की, देशात सगळ्यात मोठे बंदर जेएनपीटी आहे. ६० टक्के व्यवहार तिथे होतात. पण वाढवण बंदरामुळे सगळ्यात मोठी जहाजे तिथे येतील. वाढवण बंदर जगातील पहिल्या १० बंदरात असेल. १० लाख रोजगार उभे राहतील. हा प्रोजेक्ट १९८०चा होता. १९९२ साली होत नाही असे सांगितले गेले. मी मुख्यमंत्री झाल्यावर त्यातल्या अडचणी शोधल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे या बंदराला विरोध करत होते. पण आता त्या बंदराचे काम सुरू केले. हा प्रकल्प  महाराष्ट्राला २० वर्षे पुढे नेणार. विरोधकांना आव्हान आहे त्यांनी एक प्रोजेक्ट सांगावा केलेला. मी १०० प्रोजेक्ट सांगतो जे महाराष्ट्र बदलणारे आहेत.

फडणवीसांनी नितेश राणे यांच्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिले की, नितेश राणेंसारख्या नेत्यांमध्ये क्षमता आहे. त्यांनी कोणतीही टोकाची विधाने न करता संयम पाळला पाहिजे. हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता, तेव्हा कोणत्याही धर्माच्या बाबतीत बोलताना काळजी घ्यावी.

Exit mobile version