राज्यात लवकरच महापालिका निवडणुका पार पडणार असून याचं पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये बिनसल्याचे चित्र आहे. आघाडीमधील बिघाडी अनेकदा चव्हाट्यावर आलेली आहे. अशातच ठाकरे गटाला गळती लागली असून अनेक जुने पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाला राम राम करत आहेत. आता येऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का असा प्रश्न विचारला जात असताना ठाकरे गट मात्र सातत्याने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पुनरुच्चार करत आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत आघाडी होत नाही, कार्यकर्त्याला संधी हवी असते, असं म्हणत संजय राऊत यांनी आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला डच्चू देत स्वबळाचा नारा दिला आहे.
संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते खूप असतात. त्यांना संधी हवी असते. आघाड्या या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत होत असतात. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रत्येक जण आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न करतो. नाशिकच्या सर्व जागा आम्ही लढाव्यात अशी आमची इच्छा असल्याचं विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
प्रयागराजमध्ये हिंदू व्यावसायिकाच्या घराबाहेर आढळले गायीचे शिर
उत्तराखंडमध्ये बर्फाखाली अडकलेल्या ४७ कामगारांची सुटका; ८ कामगारांचा शोध सुरू
ट्रम्प विरुद्ध झेलेन्स्की: शांतता, युद्धाच्या मुद्द्यावरून झाली बाचाबाची
ट्रम्प यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर झेलेन्स्की यांचा माफी मागण्यास नकार
यापूर्वी संजय राऊत यांनी नागपूरमध्ये असताना म्हटलं होतं की, मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. मात्र, संजय राऊत यांनी अचानक केलेल्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये आणि त्यांच्या स्वतःच्या ठाकरे गटामध्ये देखील नाराजी पसरली होती. अनेक नेत्यांनी ही नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती.