जयपूरमधील १०० खासगी लॉकरमध्ये ५०० कोटी आणि ५० किलो सोने

भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

जयपूरमधील १०० खासगी लॉकरमध्ये ५०० कोटी आणि ५० किलो सोने

राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर पाचही राज्यांमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य किरोडी लाल मीना यांनी खळबळजनक आरोप केला आहे. मीना यांनी सांगितले की, “जयपूरमधील १०० खासगी लॉकरमध्ये ५०० कोटी रुपयांचा काळा पैसा आणि ५० किलो सोने ठेवले आहे.” तसेच पोलिसांच्या उपस्थितीत हे लॉकर उघडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित लॉकर्स कोणाचे आहेत हे सांगण्यास किरोडी लाल मीना यांनी नकार दिला. त्यांनी सांगितले की, ५० लॉकर्स कार्यरत आहेत आणि त्यापैकी १० काही अधिकार्‍यांचे आहेत. या लॉकर्समध्ये पेपर लीक, आयटी (माहिती तंत्रज्ञान) घोटाळा, जल जीवन मिशन (जेजेएम) घोटाळ्यातून लाटलेला काळा पैसा आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

किरोडी लाल मीना यांनी पोलीस, प्राप्तिकर विभाग आणि इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून लॉकर उघडण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मीना म्हणाले की, “पोलिसांनी लॉकर्स असलेल्या परिसराचे मुख्य गेट सील केले आहे. प्राप्तिकर विभागाचे एक पथकही तेथे पोहोचले होते आणि नंतर अंमलबजावणी संचालनालयाचे एक पथकही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तेथे पोहोचले आहे,”

काही दिवसांपूर्वी मीना यांनी पेपर फुटी प्रकरणात बाबुलाल कटारा यांची राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात काँग्रेस नेते दिनेश खोडानिया आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या नेत्या स्पर्धा चौधरी यांचा हात असल्याचा आरोप केला होता. कटारा यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, पेपर लीकप्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली आहे.

हे ही वाचा:

इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश

मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंडला पुण्यातून अटक

इस्रायलकडून गाझामध्ये छापे; ‘ही तर केवळ सुरुवात’ नेतान्याहू यांचा इशारा

गाझात आकाशातून पत्रके पडली, ११ लाख पॅलेस्टिनींना विस्थापित होण्याच्या सूचना

राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी २३ नोव्हेंबरला निवडणुका जाहीर केल्या होत्या, मात्र आता तारीख बदलण्यात आली आहे. देव उठनी एकादशी २३ नोव्हेंबरला आहे आणि तो दिवस राजस्थानमध्ये लग्न समारंभांसाठी एक मोठा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर राजस्थानमध्ये हजारो विवाह होतात. हे लक्षात घेऊन तारीख बदलण्यात आली.

Exit mobile version