मणिपूरमधील हिंसाचारात ४० दहशतवादी ठार

सुरक्षादलांच्या कार्यवाहीत अडथळा न आणण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले

मणिपूरमधील हिंसाचारात ४० दहशतवादी ठार

मणिपूरमधील काही भागांत रविवारी पुन्हा उसळलेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. तर, घराला आग लावणाऱ्या आणि लोकांवर गोळीबार करणाऱ्या ४० दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केल्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले.

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात असतानाही काही ठिकाणांहून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. रविवारी गोळीबाराच्या विविध घटनांत दोन जण ठार तर, १२ जण जखमी झाले. इम्फाळमधील फायेंग येथे संशयित कुकी दहशतवाद्यांनी केल्या गेलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर, एकजण जखमी झाला.

परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर आणि निमलष्कर दलातर्फे शोधमोहीम राबवली जात होती, त्याचदरम्यान संघर्ष उसळला. हा संघर्ष समाजातील दोन गटांमधला नव्हे तर, दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांदरम्यानचा असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

सशस्त्र दहशतवाद्यांनी एके ४७, एम १६ आणि स्नायपर रायफलीमधून लोकांवर गोळीबार केल्याच्या घटना आढळून आल्या आहेत, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. सुरक्षारक्षकांनी प्रत्युत्तरादाखल या दहशतवाद्यांवर गोळीबार केला.

सुरक्षादलांच्या कार्यवाहीत अडथळा न आणण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. आम्ही दीर्घकाळ चाललेला संघर्ष पाहिला असून राज्यातील जनतेला या कठीण परिस्थितीत कोणत्याही प्रकारे एकटे सोडले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

सर्वसामान्य लोकांची हत्या करणाऱ्या, त्यांची संपत्ती नष्ट करणाऱ्या आणि त्यांच्या घरांना आगी लावणाऱ्या अनेक दहशतवाद्यांना जाट रेजिमेंटने ताब्यात घेतले आहे. इम्फाळच्या आसपासच्या परिसरामधील काही घरांना लक्ष्य करून हिंसा घडवून आणण्याच्या प्रकारांत ज्या प्रकारे वाढ झाली आहे, ते बघता हा सुनियोजित हिंचासार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

आंदोलक कुस्तीपटूंविरुद्ध दंगलीचा गुन्हा

मोदींची झळाळी आणि अपशकुनी दिवाभीतांचे टोळके…

‘चालण्यासाठी वापरली जाणारी काठी म्हणून सेंगोलचा वापर झाला होता’!

आज कोण रचणार इतिहास? गुजरात की चेन्नई?

काकचिंग जिल्ह्यातील नपाट, सेरौ आणि सुगनू मध्ये दहशतवाद्यांनी मैतेई समुदायाच्या सुमारे ६०० घरांना पेटवून दिले. त्यामुळे तेथील कुटुबांना अर्ध्या रात्रीच पळून जावे लागले. सुगनूमध्ये झालेल्या गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झाला.

आमदाराच्या घरावर हल्ला

राज्यातील ३६ संवेदनशील भागांत राज्य पोलिसांची मोहीम सुरू आहे. पश्चिम इम्फाळच्या उरिपोक येथे भाजपचे आमदार ख्वाइरकपम रघुमणी सिंह यांच्या घरात तोडफोड करून त्यांच्या दोन गाड्या पेटवण्यात आल्या, अशी माहिती एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.

Exit mobile version