ज्ञानेश महारावांची चरबी उतरवली!

भाजपाचे पदाधिकारी राजेश शिरवडकरांनी विचारला खरमरीत शब्दांत जाब

ज्ञानेश महारावांची चरबी उतरवली!

पत्रकार आणि तथाकथित पुरोगामी ज्ञानेश महाराव यांनी मागे संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनादरम्यान प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थ महाराज यांची यथेच्छ बदनामी आणि टवाळी केली होती. त्यावरून महाराष्ट्रात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. बुधवारी भाजपाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महाराव यांच्याकडे धडक दिली आणि त्यांना खरमरीत शब्दांत जाब विचारला.

राजेश शिरवडकर यांनी महाराव यांच्या घरी जाऊन त्यांना सुनावले की, तुम्ही प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थांची बदनामी केलीत, त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांचे लाखो भक्त संतप्त आहेत. आज आम्ही तुम्हाला शाई फासू शकतो, तुमचे तोंड काळे करू शकतो किंवा तुम्हाला थप्पडही लगावू शकतो, पण आमच्यावर संस्कार असल्यामुळे आम्ही हे करणार नाही. पण तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या आणि प्रभू रामचंद्रांच्या लाखो भक्तांची माफी मागा. त्यावर ज्ञानेश महाराव यांनी थरथरत माफी मागितली आणि आपण असे कृत्य पुन्हा करणार नाही, असे सांगितले. शिरवडकर यांनी भविष्यातही असे कृत्य करू नका, अन्यथा मग आम्हाला संतांच्या वचनांंप्रमाणे नाठाळांच्या माथी हाणू काठी याप्रमाणे वागावे लागेल. तेव्हा महाराव यांनी पुढे आपण असे करणार नाही, असेही सांगितले.

हे ही वाचा:

‘हरियाणा जिंकले, आता महाराष्ट्र जिंकायचाय’

संजय राऊतांनी काँग्रेसला काढले चिमटे, हरियाणातील पराभवावर टीका

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा रेल्वे उलटवण्याचा कट, रुळावर ठेवल्या ‘सिमेंट स्लीपर’

महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार ही काळया दगडावरची रेघ

गेल्या महिन्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात महाराव यांनी ही बदनामीकारक वक्तव्ये आपल्या भाषणात केली होती. त्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही उपस्थित होते. त्यांना खुश करण्यासाठी अशी वक्तव्ये करण्यात आल्याची टीकाही झाली होती. शरद पवारांनी आपल्याला त्यांच्यानंतर भाषणाची संधी देणे म्हणजे फार मोठा पुरस्कार असल्याचे वक्तव्य महारावांनी केले होते. त्यावरूनही महाराव हे शरद पवारांच्या चरणी लीन झाले की काय, अशी विचारणा सोशल मीडियावर केली जाऊ लागली.

महारावांप्रमाणे उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही अनेकवेळा देवीदेवतांचा अपमान केलेला आहे. मध्यंतरी शरद पवारांच्याच कार्यक्रमात उत्तम जानकर यांनीही गणपतीचा अवमान केला होता. त्यामुळेही समाजात संताप व्यक्त होत होता. महाराव यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता, तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्याविरोधात निषेध मोर्चे काढले होते. पण आता भाजपाचे पदाधिकारी राजेश शिरवडकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे कौतुक होत असून असाच धडा देवीदेवतांची बदनामी करणाऱ्या शिकविण्यात यावा अशी मागणी पुढे येत आहे.

Exit mobile version