अमित शाह तिरुपतीला तर जेपी नड्डा श्री नैना देवीच्या चरणी

पंतप्रधान मोदींचे कन्याकुमारी येथे ध्यान सुरू

अमित शाह तिरुपतीला तर जेपी नड्डा श्री नैना देवीच्या चरणी

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून शेवटच्या टप्प्यासाठी शनिवार, १ जून रोजी मतदान होत आहे. यानंतर ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी निवडणूक प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथे पोहोचले असून तेथे ते स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपममध्ये ध्यान करत आहेत. कन्याकुमारी येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रथम कन्याकुमारी देवीला समर्पित असलेल्या भगवती अम्मान मंदिरात प्रार्थना केली. ते ४५ तास ध्यान करणार आहेत.

दरम्यान, भाजपाचे इतर बडे नेतेही मंदिरांना भेटी देत आहेत. निवडणुकीच्या प्रचारानंतर आता गृहमंत्री अमित शाह हे कुटुंबासह तिरुपती बालाजी येथे नतमस्तक झाले आहेत. तर, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही त्यांच्या कुटुंबासह हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील कुलदेवी शक्तीपीठात पूजा केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही अयोध्या येथे राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.

गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या पत्नी सोनल शाह यांनी शुक्रवारी तिरुपती बालाजी येथे जाऊन भगवान व्यंकटेश्वर स्वामींची प्रार्थना केली. यावेळी तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी यांनी अमित शाह आणी त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत केले. अमित शाह आणि पत्नी सोनल शाह यांनी अभिषेकही केला. दर्शनानंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी शाह यांना वैदिक मंत्रांचा आशीर्वाद दिला. तसेच मंदिर अधिकाऱ्यांनी त्यांना देवतेचा प्रसाद आणि छायाचित्र भेट म्हणून दिले.

दुसरीकडे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी आपल्या कुटुंबासह बिलासपूर येथील शक्तीपीठ श्री नैना देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरात त्यांनी विधीपूर्वक माता राणीची पूजा केली. फोटो शेअर करताना त्यांनी म्हटले की, “आज मला हिमाचल प्रदेशातील देवभूमीच्या बिलासपूरमधील माझ्या कुटुंबासह कुलदेवी मंदिर आणि आदिशक्ती माँ नैना देवी जी मंदिरात जाण्याचा बहुमान मिळाला. शिवालिक पर्वत रांगेत वसलेल्या या प्रसिद्ध शक्तीपीठात पूजा केल्याने लोकांमध्ये नेहमीच नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होते. यावेळी सर्व देशवासियांच्या सुख, सौभाग्य, आरोग्य आणि भरभराटीसाठी माता राणीने सर्वांना आशीर्वाद देवो अशी प्रार्थना केली.”

हे ही वाचा..

कर्नाटकातील कॉंग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी म्हणे अघोरी विद्या ?

हिंदू मुलावर मुस्लीम जमावाकडून जीवघेणा हल्ला

लंडनमध्ये ठाकरेंना घाम फुटणार, निवडणूक आयोग करणार कारवाई

लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त

निवडणुकीच्या धामधूमीनंतर पंतप्रधान मोदीही कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करत आहेत. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संध्याकाळी सुमारे ६.४५ वाजता विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यान सुरू केले असून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यान सुरू राहील. या काळात नरेंद्र मोदी हे केवळ द्रव आहार घेतील. ते फक्त नारळ पाणी आणि द्राक्षाचा रस घेतील.

Exit mobile version