काय आहे पोलंडमधील कोल्हापूर मेमोरियल?

कोल्हापूर मेमोरिअल म्हणजे कोल्हापूरच्या राजघराण्याला पोलंडवासियांनी अर्पण केलेली श्रद्धांजली

काय आहे पोलंडमधील कोल्हापूर मेमोरियल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलंड दौऱ्यावर गेले आहेत. तब्बल ४५ वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पोलंडच्या दौऱ्यावर गेले आहेत. पोलंडमध्ये नरेंद्र मोदींचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या दौऱ्यावेळी नरेंद्र मोदींनी पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर मेमोरिअललाही भेट दिली. हे स्मारक म्हणजे कोल्हापूरच्या महान राजघराण्याला पोलंडवासियांनी अर्पण केलेली श्रद्धांजली आहे, अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत. यावरून पुन्हा एकदा पोलंड आणि कोल्हापूर यांचे जुने संबंध चर्चेत आले आहेत. पोलंडवासियांना कोल्हापूरकरांचा एवढा आदर आणि जिव्हाळा का आहे हे सुद्धा यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर मेमोरिअलचा इतिहास जातो तो थेट दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. दुसऱ्या महायुद्धापासून भारत आणि पोलंडच्या मैत्रीचा धागा जुळलाय. दुसऱ्या महायुद्धाच्या सहा वर्षांच्या काळादरम्यान रशियन लष्कराने १९४४ मध्ये पोलंडमधील लोकांना त्यांच्याच देशातून हुसकावून लावले. सुरुवातीला युद्धबंदी म्हणून रशियाने त्यांना आसरा दिला. यानंतर त्यांनी पोलिश पुरुषांना दोन सैन्य विभागांमध्ये विभागले. पण, स्त्रिया आणि मुलांना सोडले जाणार होते.

दरम्यान, त्यांना युद्ध संपेपर्यंत आणि पोलंडला परत जाण्यासाठीची परिस्थिती सुरक्षित होईपर्यंत त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधण्यास सांगितले गेले. मुंबईतील पोलंडच्या वाणिज्य दूताने यासाठी पुढाकार घेत सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी १९४१ मध्ये अश्काबाद सराय येथे निर्वासितांसाठी मुंबईहून अन्न पुरवण्याची मदत केली. पोलंडच्या पंतप्रधानांनी, लंडनमध्ये निर्वासित असताना, नवानगरच्या जामसाहेबांना विनंती केल्यानंतर, १९४२ मध्ये ६५० निर्वासित मुलांची तुकडी भारतात आली. जामनगरमधील बालाचडी कॅम्पमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. जामसाहेबांनी त्यांची एवढी काळजी घेतली की पोलंडच्या लोकांनी त्यांच्या नावाने रस्त्याचे नाव देऊन त्यांची प्रशंसा केली आणि त्यांचा सन्मान केला.

पुढे कोल्हापुरात आलेल्या सुमारे ५००० निर्वासितांच्या दुसऱ्या तुकडीने कॅस्पियन समुद्रातून क्रॅस्नोोडस्को-पहलवी ते तेहरान आणि नंतर थेरिओ ते कराची ते कोल्हापूर असा खडतर प्रवास केला. कोल्हापूरजवळील वळीवडे या गावात सर्व निर्वासितांसाठी राहण्याची सोय असलेली छावणी तयार करण्यात आली. दोन स्वतंत्र शिबिरे तयार करण्यात आली, एक पालकांच्या सोबत नसलेल्या मुलांसाठी (अनाथ मुले) आणि दुसरे मुले असलेल्या महिलांसाठी. राज्य आणि कोल्हापूरच्या जनतेने त्यांचे आपुलकीने, प्रेमाने स्वागत केले आणि या पाहुण्यांना अत्यंत सन्मानाने वागवले. 

हे ही वाचा..

चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम सन्मानित

दिल्ली पोलिसांना मोठे यश; ‘अल कायदा प्रेरित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश’

शेख हसीना यांना आणखी एक धक्का, अंतरिम सरकारने पासपोर्टही केले रद्द !

मुस्लिमांच्या लग्न-घटस्फोटाची नोंदणी काझींकडे न होता सरकार दरबारी होणार

पोलंडमधील या कुटुंबांसाठी उत्तम छावण्या बांधण्यात आल्या. त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. गरजेच्या वस्तू त्यांना सहजपणे मिळण्यासाठी आठवडा बाजारही भरवण्यात येत होता. वसाहतीत घरांसोबत शाळा, पाच मुख्य सरकारी बंगले, एक सायन्स कॉलेजही होते. त्यामुळे कठीण काळात कोल्हापूरने केलेल्या मदतीची पोलंडवासियांच्या मनात आजही जाण आहे. शिवाय वळीवडे कॅम्पबद्दल आदराचे स्थानही आहे. २०१९ आणि २०२१ मध्ये वळीवडेला जोरदार पुराचा फटका बसला होता. त्यावेळी पोलंडमधील नागरिकांनी गावाला आर्थिक मदत केली होती. तसेच गुजरातमध्ये भीषण भूकंप झाला होता तेव्हा जामनगरने केलेल्या मदतीची आठवण ठेवत पोलंड भारताच्या मदतीला उभा होता.

Exit mobile version