भारताची मालदिव्सला नवीन वर्षाची भेट!

भारताची मालदिव्सला नवीन वर्षाची भेट!

भारत सरकारने आपला शेजारी मित्र राष्ट्र मालदिव्सला नव्या वर्षाची महत्वपूर्ण भेट दिली आहे. भारतातर्फे मालदिव्सला अत्यावश्यक अशा बीसीजी लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. बीसीजी लसीचे २,४०० डोस भारताकडून पाठवण्यात आले जे नवीन दशकाच्या पहाटेलाच मालदिव्स मध्ये पोचले.

लहान मुलांना देण्यात येणारी बीसीजी ही क्षयरोगावरची महत्वपूर्ण लस आहे. मालदिव्सच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत या लसीची तूट निर्माण झाली. तेव्हा या संकट प्रसंगी धावत जाऊन भारताने त्यांची मदत केली आहे. भारताने प्राधान्याने मालदिव्ससाठी लस पाठवली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि आरोग्य मंत्रालयाने या विषयात त्वरेने कार्यवाही करत मालदिव्सला ही मदत पाठवण्यात आली.

मालदिव्स मधील भारतीय दूतावासाच्या म्हणण्यानुसार, ”शेजारी राष्ट्रांना प्रधान्य देण्याच्या भारताच्या परराष्ट्र धोरणानुसार, आपण गरजेच्या प्रसंगी मालदिव्सला वेळेत आणि त्वरेने मदत करण्याची क्षमता आणि ईच्छाशक्ती भारताने दाखवली आहे.”

“परस्परा विषयी आदर, विश्वास या पायावर उभे असलेले भारत-मालदिव्स संबंध पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष सोलीह यांच्या नेतृत्वात नव्या उंचीवर पोहोचले आहेत.” असेही यावेळी  सांगण्यात आले.

२०२० मध्ये जानेवारी महिन्यात भारताने रुबेला लसीचे ३०,००० डोस मालदिव्सला पाठवले होते. कोविड काळातही मदत म्हणून भारतीय डॉक्टरांची एक टीम आणि ५.५ टन इतक्या अत्यावश्यक औषधांचा साठा मालदिव्सला पाठवण्यात आला होता. या सोबतच ‘मिशन सागर’ अंतर्गत मालदिव्स सह इतर ५ देशांना भारत सरकारतर्फे अन्नपुरवठा करण्यात आला होता. संकटसमयी शेजारील राष्ट्रांची मदत करत भारताने वेळोवेळी मित्रधर्म निभावला आहे.

Exit mobile version