बनावट ऑफर लेटरमुळे भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडा सोडावा लागणार!

या विद्यार्थ्यांची भारतातील एजंटनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.

बनावट ऑफर लेटरमुळे भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडा सोडावा लागणार!

कॉलेजप्रवेशाचे बनावट ऑफर लेटर बनवल्याप्रकरणी भारतात संभाव्य हद्दपारी होण्याच्या भीतीने असंख्य भारतीय विद्यार्थी कॅनडात रस्त्यावर उतरले आहेत. या भारतीयांमध्ये प्रामुख्याने पंजाबमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची भारतातील एजंटनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.

कॉलेजप्रवेशाचे बनावट ऑफर लेटर बनवून कॅनडात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ७०० असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात पहिल्यांदा पंजाबच्या लवप्रीत सिंगला १३ जून रोजी भारतात परत पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच आणखी डझनभर विद्यार्थ्यांची पाठवणी केली जाईल. या कारवाईच्या निषेधार्थ कॅनडामधील भारतीय विद्यार्थी २९ मेपासून कॅनडा बॉर्डर सर्व्हिस एजन्सी (CBSA) च्या मुख्य कार्यालयाबाहेर मिसिसॉगाच्या विमानतळ रोडवर अनिश्चित काळासाठी जमले आहेत.

हे निषेध मेळावे काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनासारखे भासत आहेत. ठिकठिकाणी लंगरही दिसत आहेत. पंजाबी कलाकार आणि गायकही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी अडीच लाख विद्यार्थी पंजाबमधून परदेशांत, त्यातही प्रामुख्याने कॅनडामध्ये स्थलांतरित होत आहेत. मात्र कॅनडाच्या पोलिसांनी कॉलेजप्रवेशाचे बनावट ऑफर लेटर मिळवून कॅनडात येणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. लवप्रीत सप्टेंबर २०१७मध्ये लॅम्बटन कॉलेजमध्ये व्यवस्थापन करण्यासाठी मिसिसॉगा येथे आला होता. लवप्रीतने ट्वीट करून त्याची बाजू मांडली आहे. त्याच्या एजंटने प्रथम त्याला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश दिला होता, त्या कॉलेजमध्ये न जाण्यास सांगितले. तसेच, दुसऱ्या कॉलेजमध्ये जाण्यास सांगितले. मात्र लवप्रीतला संशय आला. त्यानंतर त्याची इमिग्रेशन कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. अनेक ट्रॅव्हल एजंट अशाच प्रकारे विद्यार्थ्यांची फसवणूक करतात, त्यामुळे त्यांच्यावर हद्दपारीची टांगती तलवार आहे.

विद्यार्थ्यांनी कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री सीन फ्रेझर यांच्याशी संपर्क साधला आहे. आपण या प्रकरणी लक्ष घालू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. सीबीएसएने मात्र विद्यार्थ्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून, फसवणूक करून कॅनडामध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. या विद्यार्थ्यांना पंजाब एनआरआय व्यवहार मंत्री कुलदीप सिंग धालीवाल यांचे समर्थन मिळाले आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून मदत मागितली आहे. या विद्यार्थ्यांना हद्दपार करू नये, त्यांच्या व्हिसाचा विचार करून वर्क परमिट देण्यात यावे, अशी विनंती केली आहे.

हे ही वाचा:

युक्रेनमधील धरण कोसळल्यानंतर ग्रामस्थांचे पलायन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टीमॉडेल विमानतळ असणार

दक्षिण आफ्रिकेतील विशेष कार्यक्रमात ‘आयएनएस त्रिशूल’ सहभागी होणार

अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रात मोदी दुसऱ्यांदा संबोधित करणार

‘मी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना भेटण्यासाठी वेळही मागितला आहे,’ असे धालीवाल म्हणाले. मानवी तस्करीच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी ट्रॅव्हल एजंटना शिक्षा करण्यास मदत करावी, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केल्याची माहिती धालिवाल यांनी दिली. धालीवाल यांनी पालकांना एजंटची पार्श्वभूमी तसेच, इमिग्रेशन पेपर तपासण्याचे आवाहन केले. भटिंडाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनीही जयशंकर यांना पत्र लिहून कॅनडाच्या सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

Exit mobile version