फिफा रँकिंगमध्ये भारतीय फुटबॉल ९९व्या क्रमांकावर

सन २०१८नंतर पहिल्यांदाच यश

फिफा रँकिंगमध्ये भारतीय फुटबॉल ९९व्या क्रमांकावर

फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताने ९९वे स्थान पटकावले आहे. सन २०१८नंतर प्रथमच भारताने पहिल्या १०० संघांमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने नुकतेच कुवेतला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून सॅफ चॅम्पियनशिप जिंकली होती.

भारतीय फुटबॉल संघाने ताज्या फिफा क्रमवारीत १०० वरून ९९ स्थान पटकावले आहे. गेल्या महिन्यात भारत जागतिक क्रमवारीत १००व्या क्रमांकावर होता. भारताने २०१८नंतर प्रथमच पहिल्या १०० क्रमांकाच्या आत प्रवेश केला. प्रतिष्ठित सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली, भारत आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगतात लक्षणीय प्रगती करत आहे. इंटरकॉन्टिनेंटल आणि सॅफ चषकमधील संघाच्या अलीकडील कामगिरीमुळे भारताला ९९वे स्थान मिळाले आहे. मार्च २०२३मध्ये भारत १०६व्या क्रमांकावर होता. त्यामुळे आता केलेली कामगिरी प्रशंसनीय मानली जात आहे.

 

दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (सॅफ) चॅम्पियनशिपमधील विजय ही भारतीय फुटबॉल संघाची अलीकडच्या काळातील सर्वांत उल्लेखनीय कामगिरी आहे. संघाने खेळात सुधारणा करून तसेच, कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले होते. तसेच, आशियाई चषकापूर्वी घेतलेल्या प्रशिक्षण सत्राचाही लाभ झाला. लल्लियांझुआला छांगटे आणि सहल अब्दुल समद यांसारख्या खेळाडूंच्या ताकदीचा उपयोग करून भारतीय फुटबॉल संघाने आक्रमक खेळ केला.

हे ही वाचा:

दोन प्रकारच्या सेक्स सीडी, बीभत्स आणि राजकीय

‘इंडिया’मधील ‘आप’च्या समावेशास पंजाब काँग्रेसचा विरोध

तर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते…

दरड बळींमुळे धोकादायक वाटू लागलाय पाऊस

महान भारतीय फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील छेत्रीचा संघाच्या या यशात मोलाचा वाटा आहे. छेत्री याने १३३ सामन्यांमध्ये ८५ गोल केले असून भारतीय राष्ट्रीय संघाच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. तो आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर लिओनल मेस्सी आहे.

 

मार्च २०१५मध्ये, भारत फिफा क्रमवारीत सर्वांत तळाशी म्हणजे १७३व्या क्रमांकावर होता. तथापि, संघाने त्यांची लवचिकता आणि दृढनिश्चय दाखवून मोठी मजल मारली आहे. भारतीय फुटबॉल संघाला अद्याप पुरुष किंवा महिला विश्वचषकात सहभागी होता आलेले नाही, तरी त्यांची अलीकडील कामगिरी आशादायक आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांनी अलीकडेच भारताच्या पंतप्रधानांना आशियाई क्रीडा २०२३मध्ये भारतीय संघाला खेळू द्यावे, अशी विनंती करणारे पत्र लिहिले आहे. येथे खेळल्यामुळे भारतीय संघाला फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version