बांगलादेशमधील अराजकतेचा परिणाम नागपूरच्या संत्र्यांवर? निर्यात रखडली

बांगलादेशमध्ये नागपूरच्या संत्र्यांना मोठी मागणी; अडीच लाख टन संत्री होतात निर्यात

बांगलादेशमधील अराजकतेचा परिणाम नागपूरच्या संत्र्यांवर? निर्यात रखडली

बांगलादेशमधील अराजकतेचा परिणाम महाराष्ट्रासह देशाच्या व्यापारावर दिसून येत आहे. राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बांगलादेशमधील उसळेल्या हिंसाचारामुळे मोठं संकट उभं ठाकलं आहे. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन होते. बांगलादेशमधून या संत्र्यांना मोठी मागणी असते. पण, आता बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे संत्री उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

महाराष्ट्रातील नागपूरसह आजूबाजूच्या परिसरात संत्र्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतेले जाते. या संत्र्यांना परदेशातही मागणी आहे. तसेच बांगलादेशमध्येही नागपूरच्या संत्र्यांना मोठी मागणी असून हंगामात बांगलादेशला अडीच लाख टन संत्र्याची निर्यात होते. पण, बांगलादेशमधील अराजक स्थितीमुळे संत्र्यांची निर्यात रखडली आहे. बांगलादेशमधील अंतर्गत कलहाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे विदर्भातून बांगलादेशला निर्यात होणाऱ्या अडीच लाख टन संत्र्याचं यंदा करायचं काय? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.

गेल्या काही वर्षात बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या संत्र्यावर भरमसाठ आयात शुल्क लावले असले, तरी बांगलादेशमध्ये संत्र्याची मागणी काही कमी झाली नव्हती. त्यामुळे विदर्भातील अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या संत्रा बागांमध्ये लाखो रुपये गुंतवून निर्यात योग्य, दर्जेदार संत्रा उत्पादनासाठी खास प्रयत्न सुरू केले होते. मात्र, आता बांगलादेशमधील अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे बांगलादेशातील एक ही व्यापारी विदर्भातून संत्रा घेऊन जायला तयार नाही.

अजूनही संत्र्याचे उत्पादन बाजारात येण्यास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ऑक्टोबर महिन्यात संत्री बाजारात येण्यास सुरुवात होईल. यंदा संत्र्याचा बहारही चांगला असल्याने दमदार उत्पादन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ शोधण्यास मदत करावी, अशी अपेक्षा संत्रा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

… म्हणून मुनव्वर फारुकीने मराठी माणसाची मागितली माफी!

भारतीय मार्केटवर हिंडेनबर्ग अहवालाचा परिणाम ‘फुस्स’

बंगालच्या सीमेवर बांगलादेशी तस्करांचा बीएसएफ जवानांवर हल्ला, कारवाईत एक ठार !

ठाकरेंचे लोणचे घालण्याची प्रक्रिया सुरू!

बांगलादेशमध्ये यावर्षी न जाऊ शकणारा संत्रे चीन किंवा आखाती देशांमध्ये निर्यात करता येऊ शकतो, असं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाटत आहे. मात्र त्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे दोघेही संत्रा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version