“भारत आणि जर्मनीमधील मैत्री प्रत्येक टप्प्यावर, आघाडीवर अधिक घट्ट होतेय”

‘जर्मन व्यवसाय २०२४’ च्या आशिया- पॅसिफिक परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काढले गौरवोद्गार

“भारत आणि जर्मनीमधील मैत्री प्रत्येक टप्प्यावर, आघाडीवर अधिक घट्ट होतेय”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन व्यवसाय २०२४ च्या १८ व्या आशिया- पॅसिफिक परिषदेत बोलताना भारत आणि जर्मनी यांच्यातील दृढ संबंधांबद्दल भाष्य केले. तसेच दोन्ही देशांमधील घट्ट होत असलेल्या मैत्रीचा पुरावा म्हणून अलीकडील सहकार्यांचा उल्लेख करून या मजबूत संबंधांचे कौतुक केले.

जर्मन व्यवसाय २०२४ च्या १८ व्या आशिया- पॅसिफिक परिषदेत बोलताना शुक्रवार, २५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “एकीकडे सीईओ फोरमची बैठक इथे होत आहे आणि दुसरीकडे आपले नौदल एकत्र सराव करत आहेत. जर्मन नौदलाची जहाजे गोव्यात असून थोड्याच वेळात, भारत आणि जर्मनी यांच्यातील सातव्या आंतर- सरकारी सल्लामसलतीचे आयोजन केले जाणार आहे. म्हणजेचं भारत आणि जर्मनी यांच्यातील मैत्री प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक आघाडीवर अधिक घट्ट होत आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “या वर्षी भारत आणि जर्मनीच्या धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि पुढील २५ वर्षे ही भागीदारी नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्ही येत्या २५ वर्षात विकसित भारतासाठी एक रोडमॅप तयार केला आहे,” असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींनी जर्मन मंत्रिमंडळाने ‘फोकस ऑन इंडिया’ या दस्तऐवजाच्या प्रकाशनाचे कौतुक केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “मला आनंद आहे की अशा निर्णायक वेळी, जर्मन मंत्रिमंडळाने ‘फोकस ऑन इंडिया’ दस्तऐवज जारी केले आहे. भारतावर फोकस दस्तऐवज हे जगातील दोन मजबूत लोकशाही, जगातील दोन आघाडीच्या अर्थव्यवस्था एकत्र कसे एक शक्ती बनू शकतात याची ब्लू प्रिंट आहे. हे स्पष्टपणे धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याचा दृष्टीकोन आणि वचनबद्धता दर्शवते,” असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

हे ही वाचा : 

देशांतर्गत राजकीय फायद्यासाठी ट्रूडो सरकार खालिस्तानी दहशतवाद्यांना संरक्षण देतंय

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर १० लाखांचे बक्षीस!

भारत- चीनमध्ये झालेल्या करारानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्य माघारी घेण्यास सुरुवात

झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज

“आमचा परस्पर व्यापार ३० अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचला आहे. आज एकीकडे शेकडो जर्मन कंपन्या भारतात आहेत, तर भारतातील कंपन्याही जर्मनीमध्ये झपाट्याने वाढत आहेत. आज भारत हे सर्वात मोठे केंद्र बनत आहे. वैविध्यपूर्ण आणि जोखीममुक्त भारत देखील जागतिक व्यापार आणि उत्पादनाचे केंद्र बनत आहे, अशा परिस्थितीत मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्डसाठी ही सर्वात योग्य वेळ आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version