“बांगलादेशातील एक कोटी हिंदू निर्वासितांना आश्रय देण्यासाठी तयार राहा”

भाजपा नेते आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे आवाहन

“बांगलादेशातील एक कोटी हिंदू निर्वासितांना आश्रय देण्यासाठी तयार राहा”

भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून हिंसाचार उसळून आला आहे. येथील परिस्थिती गंभीर असून शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्या भारतात आश्रयासाठी आल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशीमधील परिस्थिती बिघडल्यानंतर या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. दरम्यान, या परिस्थितीनंतर बांगलादेशातील हिंदूंचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बांगलादेशमधील जवळपास १ कोटी हिंदू निर्वासित भारतात येतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपा नेते आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी यासंबंधी महत्त्वाची टिपण्णी केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अधिकारी म्हणाले की, “पश्चिम बंगालच्या लोकांनी बांगलादेशातील एक कोटी हिंदू निर्वासितांच्या प्रवेशासाठी तयार राहावे. बांगलादेशात हिंदूंची कत्तल केली जात आहे. रंगपूर नगर परिषदेचे नगरसेवक हरधन नायक यांची हत्या करण्यात आली आहे. सिराजगंज येथे तेरा पोलिसांची हत्या करण्यात आली होती, त्यापैकी नऊ हिंदू होते. नोआखली येथील हिंदूंची निवासस्थाने जाळण्यात आली आहेत. मी राज्यपाल सीव्ही आनंदा बोस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केंद्र सरकारशी बोलण्याची विनंती करू इच्छितो. कारण नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात हे स्पष्टपणे नमूद केले आहे. बांगलादेशात जर कोणी धार्मिक हिंसाचाराचा बळी ठरला तर आपण त्यांना आवश्यक आश्रय दिला पाहिजे,” असं सुवेंदू अधिकारी म्हणाले.

“एक कोटी हिंदू निर्वासितांना आश्रय देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा. मी त्यासाठी तयार आहे,” असं वक्तव्य त्यांनी केले आहे. १९७१ प्रमाणे आताही बांगलादेशातून आलेल्या हिंदू निर्वासितांना आश्रय देण्याचे आवाहनही त्यांनी पश्चिम बंगालमधील हिंदू जनतेला केले आहे.

हे ही वाचा:

सत्ताधारी अवामी लीगचा खासदार मशर्फे मूर्तझाचे घर जाळले; नेते शाहीन चकलादार यांचे हॉटेल पेटवले

“शेख हसीना कदाचित बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत”

बांगलादेशातील हिंसाचारामुळे आयसीसी चिंतेत; महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे ठिकाण बदलणार?

मूकबधिर तरुणांनीच केली मूकबधिर तरुणाची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये

सरकारी नोकऱ्यांमधील कोट्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने बांगलादेशात आता आठवड्यापासून अशांततेचे वातावरण आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याने देश सध्या राजकीय संकटाचा सामना करत आहे. मात्र, त्यानंतरही हिंसाचार थांबलेला नसून अजूनही जाळपोळ सुरू आहे. शेख हसीना सध्या भारतात आश्रयासाठी थांबल्या आहेत.

Exit mobile version