गोरेगाव पूर्व येथे राहणाऱ्या २८ वर्षीय रंजूने प्रियकर शाहरुखच्या आणि त्याच्या दोन मित्राच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रंजू आणि शाहरुखच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे. शाहरुख आणि त्याचा आणखी एका मित्र फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
चंद्रशेखर चौहान (३६) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. चंद्रशेखर हा पत्नी रंजू (२८)सह गोरेगाव पूर्व बंजारीपाडा येथे राहात होता.१५ मार्च रोजी चन्द्रशेखर घरात मृतावस्थेत आढळून आला होता, पोलिसांनी पत्नी रंजू हिचा जबाब घेतला असता तिने पोलिसांना सांगितले की, तिने रात्री १.३० वाजता झोपण्यासाठी जाताना पतीला शेवटचे बघितले होते. त्यावेळी ते जिवंत होते. तसेच मागील काही दिवसांपासून पहाटे कोणीतरी त्यांचा दरवाजा ठोठावत होते आणि तिचा पती हे दरवाजा कोण ठोकतय हे बघण्यासाठी बाहेर गेले होते, ती सकाळी ५.४५ च्या सुमारास उठली आणि तिच्या रोजच्या कामात होती, तेव्हा तिचा पती झोपलेला होता अशी माहिती पत्नी रंजू हिने पोलिसांना दिली. सकाळी ७ वाजता तिने पतीला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र पतीची कुठलीही हालचाल होता नसल्यामुळे तिने दादर येथे राहणाऱ्या तिच्या मेहुण्याला फोन करून काहीतरी गडबड असल्याचे सांगितले अशी माहिती रंजूने पोलिसांना दिली.
पत्नी रंजूने पोलिसांना दिलेल्या माहितीत संशय आला, तसेच चंद्रशेखर चौहानच्या गळ्यावर गळा दाबून मारल्याच्या खुणा आढळल्या. पोलिसांनी रंजूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यांनी तिचे फोन रेकॉर्ड तपासले असता असे आढळले की तिने रात्री अनेक लोकांना फोन केले होते.यातील काही कॉल काही मिनिटांत झाले.
यापैकी एक नंबर शाहरुख नावाच्या एका व्यक्तीचा होता, पण त्याने त्याचा फोन बंद केला होता. त्यानंतर पोलिसांनी शाहरुखच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केली आणि तो वारंवार डायल करत असलेले काही नंबर आढळले. त्यापैकी एक नंबर २० वर्षीय मोइनुद्दीन खानचा होता. पोलिसांनी त्याचे लोकेशन शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता खान याने हत्येची कबुली दिली.
हे ही वाचा:
युद्धग्रस्त गाझामधील परिस्थितीबद्दल भारताने व्यक्त केली चिंता
भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधरीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी
चेन्नई विरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधारपदाची धुरा सुर्यकुमार यादवकडे
रंजू आणि शाहरुखमध्ये प्रेमसंबंध होते आणि ते चन्द्रशेखरला दूर करण्याच्या प्रयत्नात होते. त्यातुन त्यानी त्याच्या हत्येचा कट रचला या कटात शाहरुख याने दोन मित्रांना सामील करून घेतले.
चंद्रशेखर हा दारूच्या नशेत असताना रंजूने शाहरुख ला रात्री बोलावून घेतले, शाहरुख हा दोन मित्राना घेऊन रंजूच्या घरी आला व त्याने मित्राच्या मदतीने चंद्रशेखर याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिघेही घरातून निघून गेले, अशी माहिती खान याच्या चौकशीत समोर येताच पोलिसांनी रंजू आणि खान या दोघांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. शाहरुख आणि त्याच्या आणखी एका मित्राचा शोध घेण्यात येत आहे.