मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; जिरीबाम जिल्ह्यातील गावात बॉम्बस्फोट

सुदैवाने जीवितहानी नाही

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; जिरीबाम जिल्ह्यातील गावात बॉम्बस्फोट

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. शनिवार, १९ ऑक्टोबर रोजी जिरीबाम जिल्ह्यातील एका गावावर अतिरेक्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर याठिकाणी हिंसाचार उसळला. दहशतवाद्यांनी या गावाला लक्ष्य करून बॉम्बस्फोट केले यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवादी अशा दोन्ही बाजूने गोळीबार झाला.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही दहशतवाद्यांनी पहाटे ५ वाजता बोरोबेकरा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका गावाला आधुनिक शस्त्रांनी लक्ष्य केले. यावेळी बॉम्बस्फोटही करण्यात आले. यानंतर तातडीने केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. यातूनच दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला.

घटनेची माहिती मिळताच, तातडीने घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ज्यावेळी हा हिंसाचार उसळला त्यावेळी सुरक्षा दलाने तातडीने वृद्ध, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलविले.

बोरोबेकरा हे जिरीबाम शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले घनदाट जंगलांनी वेढलेले आणि डोंगराळ भाग असलेले गाव आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात राज्यात जातीय हिंसाचार भडकल्यानंतर या भागात असे अनेक हल्ले झाले आहेत.

हे ही वाचा..

इस्रायल पंतप्रधान नेतन्याहू यांच्या खासगी निवासस्थानाजवळ ड्रोनचा स्फोट

शुटरच्या फोनमध्ये झीशान सिद्दीकीचा फोटो सापडला

…म्हणून केले सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन

ठाकरे गट, काँग्रेस वादावर संजय राऊतांची सारवासारव; वैयक्तिक टीका न केल्याचे वक्तव्य

मणिपूर गेल्या एक वर्षाहून अधिक काळ हिंसाचाराच्या आगीशी झुंज देत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मैतई, कुकी आणि नागा समाजाच्या आमदारांमध्ये चर्चेसाठी नवी दिल्लीत बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये एकूण १७ आमदारांनी सहभाग घेतला होता. यापैकी ९ मैतई समाजातील, ५ कुकी समाजातील आणि ३ नागा समाजातील होते. या बैठकीच्या काही दिवसांनीच हा हिंसाचार पाहायला मिळाला.

गेल्या वर्षी मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात २०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच, नुकत्याच झालेल्या बैठकीत कुकी आमदारांनी मणिपूरच्या आदिवासी लोकांसाठी स्वतंत्र प्रशासन किंवा केंद्रशासित प्रदेश या मागणीचा पुनरुच्चार केला.

Exit mobile version