शाळा, महाविद्यालयांना असलेल्या उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेऊन अनेक कुटुंबीय पर्यटन स्थळे गाठत आहेत. सुट्ट्यांचा हंगाम असल्याने जम्मू- काश्मीरमध्येही मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत. मात्र, मंगळवारी झालेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. यात २७ जणांनी आपले प्राण गमावले असून हिंदूंना लक्ष्य करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश असून डोंबिवलीमधील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला आहे.
मुलाची दहावीची परीक्षा संपली आणि आता सुट्ट्यांसाठी म्हणून डोंबिवलीतील हेमंत जोशी हे कुटुंबासह जम्मू- काश्मीर सहलीसाठी गेले होते. मात्र, त्यांची ही सहल अखेरची ठरली. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात डोंबवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह अतुल मोने, संजय लेले यांचाही या हल्ल्यात बळी गेला.
डोंबिवलीतील अतुल मोने हे त्यांच्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी गेले होते. तसेच हेमंत जोशी देखील त्यांच्या कुटुंबासोबत फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी मोनिका आणि मुलगा देखील होते. त्यांचा मुलगा ध्रुव याची दहावीची परीक्षा संपली होती आणि परीक्षा संपल्याने ते काश्मीरला गेले होते, मात्र तेथे हेमंत यांनी जीव गमावला. त्यांच्या मृत्यूने डोंबिवलीत शोककळा पसरली आहे. आम्ही सुरक्षित आहोत का असा सवाल संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हेमंत जोशी हे डोंबिवली भाग शाळा मैदानासमोरील सावित्री या इमारतीमध्ये राहत होते . त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात रहिवाशांमध्ये शोककळा पसरली आहे. हल्ल्याची बातमी समजताच रहिवाशांनी जोशी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मेसेजही पाठवले मात्र मेसेज डिलीव्हरच झाले नाही, असे जोशी यांचे शेजारी प्रमोद गुप्ता यांनी सांगितले. जोशी यांच्या सासऱ्यांना भेटले असता त्यांनी हेमंत जोशी यांच्या मृत्यूची पुष्टी केली.
हे ही वाचा..
पहलगाम हल्ल्यात विशाखापट्टणमच्या निवृत्त बँकरचा मृत्यू
पहलगाम हल्ला : मुंबईतील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष
पहलगाम दहशतवादी हल्ला : जम्मू-काश्मीर सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख
खासगी क्षेत्रातील सबस्क्राइबर्सची संख्या १२ लाख पार
दरम्यान, इमारतीतील रहिवाशांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. सर्वसामान्य माणूस भारतात सुरक्षित आहे का? काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्यावर गोळीबार होतो, भारतात आम्ही सुरक्षित आहोत का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित करत शोक व्यक्त केला आहे. तसेच सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.