शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना आता फाशीऐवजी जन्मठेप

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना आता फाशीऐवजी जन्मठेप

मुंबई उच्च न्यायालयाने शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील तीन दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. यादरम्यान, न्यायालयाने सांगितले की, केलेल्या गुन्ह्यांचा दोषींना पश्चात्ताप होण्यासाठी फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. ही घटना आहे २०१३ सालची. शक्ती मिलच्या आवारात एक महिला पत्रकार फोटो काढत असताना तिला तिथे आधीच उपस्थित असलेल्या लोकांनी अडविले. तिच्या सहकाऱ्याला बांधून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला.

न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने दोषी विजय जाधव, कासिम शेख आणि मोहम्मद अन्सारी या दोषींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

२०१३ मध्ये २२ वर्षीय महिला पत्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत शक्ती मिलमध्ये पोहोचली. अनेक वर्षांपासून गिरणी बंद असल्याने येथे कोणीही फिरकत नव्हते. मात्र महिला पत्रकार आणि तिचा साथीदार याठिकाणी पोहोचताच तेथे आधीच उपस्थित असलेल्या लोकांनी पोलीस असल्याची बतावणी करत येथे छायाचित्र काढण्यास मनाई केली आणि सांगितले की इथे फोटो काढायचे असतील तर आमच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल.

यानंतर पत्रकार आणि त्यांचे साथीदार खोलीत गेले असता दोघांवरही हल्ला करण्यात आला. तिच्या सहकाऱ्याला बांधून तेथे उपस्थित असलेल्या पाच जणांनी महिला पत्रकारावर बलात्कार केला. नंतर कसेबसे दोन्ही पीडित रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर रुग्णालयात संपूर्ण प्रकरण समजताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी ७२ तासांत पाच आरोपींना अटक केली.

शक्तीमील सामुहिक बलात्कारप्रकरणी कोर्टाच्या निकालाचा सन्मान आहेच, पण आम्हाला पूर्ण न्यायाची अपेक्षा होती. याआधी ही १९ वर्षीय तरुणीने गुन्हा नोंदवल्याची माहिती आहे, ज्यात हे आरोपी होते. आरोपी वासनांध सराईत आहेत, या नराधमांना फासावर लटकवायला हवं, अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

Exit mobile version