निठारी हत्याकांडातील आरोपी निर्दोष सुटल्याचं दुःख झालं पवन जल्लादला!

निठारी हत्याकांडातील आरोपी निर्दोष सुटल्याचं दुःख झालं पवन जल्लादला!

निठारी हत्याकांडाप्रकरणातील मुख्य आरोपी सुरिंदर कोहली आणि मोनिंदरसिंग पंधेर यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने आणखी कोणाला धक्का बसला असेल तर ते आहेत, हँगमॅन पवन कुमार. ज्यांना पवन जल्लाद म्हणूनही ओळखले जाते. सन २०१५मध्ये मेरठ तुरुंगात असताना कोहलीला गळफास देण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते.

 

‘गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेल्या तसेच, राष्ट्रपतींनीही ज्याची दयायाचिका फेटाळली आहे, असा गुन्हेगाराची निर्दोष सुटका होणे हे खरोखर खेदजनक आहे,’ अशी प्रतिक्रिया पवन कुमार यांनी दिली. त्यांनी तेव्हा कोहली याला फाशी देताना केलेल्या तयारीविषयी सांगितले.

 

 

‘कोहलीला फाशी देण्यासाठी मी १० दिवसांपूर्वीपासूनच तयारीला लागलो होतो. कारण ७०च्या दशकानंतर मेरठ तुरुंगात एकही फाशी झाली नव्हती,’ असे त्यांनी सांगितले. ‘मला आठवतेय, त्याला फाशी देण्यासाठी अवघा एक तास शिल्लक होता. सप्टेंबर २०१५मध्ये त्याला मी फाशी देणार होतोच. मात्र त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत केली गेल्याचा उच्च न्यायालयाचा आदेश आला आणि तो माझ्या हातातून निसटला,’ अशी प्रतिक्रिया पवन कुमार यांनी दिली.

 

 

पवन कुमार यांच्या चार पिढ्या ‘हँगमॅन’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सन २०२०मध्ये निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी दिली होती. पवन यांचे पणजोबा लक्ष्मण राम हे ब्रिटिशांच्या राजवटीत कार्यरत होते. त्यांनी भगत सिंग यांना फाशी दिली होती. तर, त्यांचे आजोबा कल्लू यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशी दिली होती. त्यांचे वडील माम्मू हे ४७ वर्षांत राज्यातील तुरुंगात हँगमन होते. त्यांचा मृत्यू १९ मे २०११ रोजी झाला. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून पवन हे सन २०१३मध्ये उत्तर प्रदेशातील तुरुंग संचालनात कार्यरत झाले. त्यांचे काम आदर्श काम असल्याचे ते मानतात.

हे ही वाचा:

एकनाथ खडसे आणि कुटुंबियांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे!

बायडन आणि नेतान्याहू यांची भेट; हमासवर साधला निशाणा

केरळमध्ये होते इस्रायलमधील पोलिसांच्या गणवेशांची निर्मिती

 

‘एक हँगमन म्हणून मी समाजातून दुष्टांचा निःपात करतो. हे माझे कर्तव्य आहे आणि अशा गुन्हेगारांचा निःपात करण्याचे काम माझे कुटुंब परंपरेने करत असल्याचा मला अभिमान आहे,’ असे पवन सांगतात. हँगमन कुटुंबातील व्यक्तीसाठी कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही. ‘मी माझ्या आजोबांना दोरखंड बांधायला मदत करायचो. ती तांत्रिक बाब आहे. फाशी देतेवेळी हा दोरखंड व्यवस्थित असावा लागतो. ही संपूर्ण प्रक्रिया अगदी नियोजनबद्धतेने पार पाडायची असते. ती व्यक्ती कितीही मोठा गुन्हेगार असली तरी, मरत असलेल्या व्यक्तीप्रति आपण संवेदना राखली पाहिजे,’ असे ते सांगतात.

 

 

फाशी देताना प्रत्येक बाबीची काटेकोर काळजी घेतली जाते. जिला फाशी दिली जात आहे, त्या दोषी व्यक्तीचे वजन, दोरखंडाचा मजबूतपणा आणि गुन्हेगार फाशी देतेवेळी ज्या ठिकाणी उभा राहणार, तो प्लॅटफॉर्म हे सगळे तपासून पाहिले जाते. फाशी देणे ही दुर्मीळ घटना असल्यामुळे अनेक वस्तू या अनेक दशकानंतर वापरल्या जातात. त्यामुळे त्या व्यवस्थित आहेत की नाहीत, याची पडताळणी केली जाते.

 

पवन कुमार यांना महिन्याला साडेसात हजार रुपये वेतन मिळते. हे वेतन एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे नसल्याचे ते सांगतात. या वेतनात वाढ केली पाहिजे आणि त्यांना सर्व लाभांसहित सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. ‘शेवटी मी एक वाईट कामच करतोय,’ असेही ते सांगतात,

Exit mobile version