नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार उसळला. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यात दगडफेक आणि जाळपोळ झाली. पोलिसांवर आणि अग्निशमन दलाच्या जवानांवरही हल्ला झाला. या हिंसाचारामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता असून काही भागात अजूनही संचारबंदी कायम आहे. दरम्यान, नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात फहीम खान याचे मास्टरमाइंड म्हणून नाव समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी बुधवारी अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) स्थानिक नेता फहीम शमीम खान याला अटक केली. औरंगजेबाच्या कबरीवरून १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारमागे फहीम शमीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी फहीम खानला २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडीही सुनावण्यात आली. यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानसह ५० आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. या हिंसाचाराच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बांगलादेशमधील दहशतवादी संघटनेचा या नागपूर राडा प्रकरणात सहभाग असल्याच समोर आले आहे.
गणेशपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये फहीम खानचे नाव अधिकृतपणे समाविष्ट झाल्यानंतर काही तासांतच त्याला अटक करण्यात आली. आदल्या दिवशी पोलिसांनी त्याचे छायाचित्र आणि हिंसाचार सुरू होण्यापूर्वी खान कथितपणे प्रक्षोभक भाषण देत असल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. यामध्ये तो चिथावणीखोर भाषण देताना दिसत आहे. नागपूरमधील तणावाबाबत पोलिसांनी ५१ लोकांवर एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये फहीम शमीम खान याचे नाव आघाडीवर आहे. फहीम खाननेच सगळ्यातआधी सकाळी ११ वाजता ३० ते ४० जणांना जमा केले आणि पोलिसांना निवेदन देण्यास गेला. यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात त्याने तक्रार पोलिसांकडे केली. यानुसार पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर देखील फहीम खानने पुन्हा जमाव एकत्र केला आणि तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली. पोलीस हिंदु समाजाचे आहेत, आपली मदत ते करत नाही, असे सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता, अशी माहिती समोर आली आहे.
अटक करण्यात आलेला फहीम खानने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रतिनिधित्व केले होते. उल्लेखनीय म्हणजे, त्याने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती, परंतु त्याला ६.५ लाखांहून अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला होता.
हे ही वाचा:
दिशा सालियन हत्या प्रकरण आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या अंगाशी येणार?
युद्धग्रस्त गाझामधील परिस्थितीबद्दल भारताने व्यक्त केली चिंता
नागपूर हिंसाचार: विहिंप आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण!
गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. सायंकाळी अचानक दोन्ही गट एकमेकांसमोर आले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली, दगडफेक झाली. जाळपोळीच्या घटनाही घडल्या.