‘बंगालमधील कायदा, सुव्यवस्था यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे’

कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला झापले

‘बंगालमधील कायदा, सुव्यवस्था यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे’

कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी पश्चिम बंगालमधील सरकारवर ताशेरे ओढले. आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात घडलेली बलात्काराची आणि त्यानंतर झालेल्या हत्येच्या घटनेचे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आल्यानंतर आता याच रुग्णालयावर झालेला हल्ला आणि झालेली मोडतोड या सगळ्याची चौकशी करण्यास न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे.

पश्चिम बंगाल सरकारने म्हटले होते की, पोलिसांनी या रुग्णालयावर धावून गेलेल्या जमावाला थांबविण्याचा प्रयत्न केला पण तो जमाव जवळपास ७ हजारांचा असल्यामुळे पोलिसांना त्यात अपयश आले. त्यामुळे अनेक पोलिस त्या हल्ल्यात जखमी झाले. त्यावर न्यायालयाने म्हटले की, जर पोलिस स्वतःचेच रक्षण करू शकत नसतील तर ते डॉक्टर आणि इतरांचे कसे काय रक्षण करू शकतील.

न्यायालयाने असेही म्हटले की, जर अशी अवस्था असेल तर हे रुग्णालय बंद करून रुग्णांना अन्यत्र हलविण्यात येईल.

न्यायाधीश शिवज्ञानम आणि न्या. हृण्मय भट्टाचार्य यांच्यासमोर हे प्रकरण आलेले आहे. राज्याच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले की, जवळपास ७ हजारांचा हा जमाव रुग्णालयावर धावून आला होता. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पण जमावाने तिथे लावलेले अडथळे फेकून दिले आणि रुग्णालयात घुसून तोडफोड केली. या सगळ्यात जवळपास १५ पोलिस जखमी झाले. पोलिसांच्या गाड्याही फोडण्यात आल्या.

यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. अशा प्रकारचा हल्ला होणार आहे, याची खबर पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला नव्हती का, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

हे ही वाचा:

समान नागरी कायदा, मोदींनी लाल किल्ल्यावरून शड्डू ठोकले…

‘लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात

पोलिसांच्या नाकाबंदीत २ कोटींचा ड्रग्स साठा जप्त, एकाला अटक

मुंब्र्यात आला टिपू सुलतान; तिरंगा रॅलीत झळकले फोटो !

न्यायाधीश शिवज्ञानम म्हणाले की, सर्वसाधारणपणे पोलिसांकडे गुप्तचर यंत्रणा उपलब्ध आहे. अशीच घटना हनुमान जयंतीलाही घडली. ७ हजार लोक एकाच ठिकाणी जमले पण पोलिसांना त्याची खबरबात नव्हती यावर विश्वासच ठेवता येत नाही.

त्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, लोकांनी एकत्र व्हावे यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. त्यावर न्यायालय म्हणाले की मग जमावबंदीचे १४४ कलम का लागू करण्यात आले नाही. पोलिस यंत्रणा आणि कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे, असेच यावरून म्हणता येईल. स्वतःचे रक्षण करण्यातही पोलिसांना यश आले नाही.

Exit mobile version