कठुआमधील हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून; स्थानिकांनी मदत केल्याची माहिती

हल्ल्यात पाच जवान हुतात्मा

कठुआमधील हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून; स्थानिकांनी मदत केल्याची माहिती

जम्मू आणि काश्मीरच्या कठुआमध्ये सोमवारी लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे पाच जवान हुतात्मा झाले. दरम्यान, हा हल्ला अत्याधुनिक शस्त्रे वापरून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता, अशी माहिती समोर आल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर भागातून लष्कराचे वाहन जात असताना अचानक या वाहनावर गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांनी एका टेकडीवरून लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. शिवाय या दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडही फेकले. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अत्याधुनिक बंदुकींच्या सहाय्याने केला. शिवाय दहशतवाद्यांनी स्थानिक समर्थकांच्या मदतीने परिसराची गुप्त तपासणी देखील केली होती. अत्याधुनिक शस्त्रांमध्ये एम- ४ कार्बाइन रायफल आणि स्फोटक उपकरणांचा समावेश आहे.

काठुआमधील बडनोटा गावात, जिथे हा हल्ला झाला त्या भागात योग्य दळणवळणाच्या सुविह नसल्यामुळे वाहने ताशी १० ते १५ किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जाऊ शकत नाहीत. तशीच लष्कराची वाहने देखील या भागातून अतिशय संथ गतीने जात असल्याने दहशतवाद्यांनी या भूभागाचा फायदा घेतला. दोन ते तीन दहशतवादी आणि एक दोन स्थानिकांनी पूर्वीच टेकडीवर जागा निवडून घेतली होती. दहशतवाद्यांनी आधी लष्कराच्या वाहनांवर ग्रेनेड फेकले आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार केला. आधीच्या दहशतवादी हल्ल्यांप्रमाणेच वाहनाचा ड्रायव्हर हे त्यांचे पहिले लक्ष्य होते, अशी माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासात असेही आढळून आले आहे की, हा हल्ला होण्यापूर्वी दहशतवाद्यांनी या भागात गुप्तहेर नेमले होते. एका स्थानिक मार्गदर्शकाने दहशतवाद्यांना परिसराची माहिती दिली. त्यांना अन्न आणि निवारा देखील दिला. हल्ल्यानंतर, त्याने त्यांना त्यांच्या लपलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास मदत केली, अशी माहिती उघड झाली आहे.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवानांना हौतात्म्य

पंतप्रधान मोदींचे रशियात जंगी स्वागत, विमानतळावर गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित!

वरळी अपघात प्रकरण – मिहीर शहा विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी!

काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी घरातील कपाटाच्या मागे खोदला होता बंकर

हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मंगळवारी कठुआमध्ये मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरूच आहे. जवळच्या जंगलात दहशतवादी पळून गेल्याची माहिती आहे. मात्र, डोंगराळ भाग, धुके आणि दाट झाडी हे शोध मोहिमेत मोठे अडथळे बनले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करी जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैनिक निश्चयी आहेत असं म्हटलं आहे.

Exit mobile version